सातारा – सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून विविध गुन्ह्यांनी डोके वर काढले आहे. पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी बसवलेली घडी कायम राखण्यात सध्याचे कारभारी भगवान निंबाळकर यांना अपयश आल्याचे चित्र आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले घरफोड्या, दुचाकी चोरींचे सत्र पाहता सातारा शहराची सुरक्षा सध्या तरी “भगवान’ भरोसे असल्याचे चित्र आहे. साताऱ्यात आल्यापासून निंबाळकर यांना शहराची नाडी सापडली नसल्याने काम करण्यासाठी त्यांना सूर सापडत नसल्याची चर्चा आता पोलीस ठाण्यातच सुरू झाल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सातारा शहर पोलीस ठाणे जिल्ह्यातील संवेदनशील पोलीस ठाणे आहे. जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या पोलीस ठाण्याकडे सर्वांचे लक्ष असते. शहराची वाढती लोकसंख्या व गुन्हेगारी पाहता याठिकाणी नियोजनबध्द काम करणे गरजेचे आहे. यापूर्वी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, आण्णासाहेब मांजरे या अधिकाऱ्यांनी शहरात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. अपवाद वगळता सारंगकर यांना चांगले यश आले तर मांजरे यांनी तर सर्वांशी संबंध प्रस्थापित करून गुन्हेगारी कारवाया थांबवून शहराची घडी चांगल्या पध्दतीने बसवली होती.
मात्र, मांजरे यांच्या बदलीनंतर सांगोल्यावरून साताऱ्यात आलेले पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना अपेक्षित काम करण्यासाठी अद्याप तरी सूर गवसलेला दिसत नाही. परिणामी शहराच्या हद्दीत अनेक अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे. गेल्या महिन्यात शहरच्या हद्दीत घरफोड्या, दुचाकी चोरींच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शहरात पोलिसांपेक्षा चोरट्यांची दहशत वाढल्याचे चित्र आहे.
साताऱ्यात आल्यानंतर चुकीच्या गोष्टींना कायद्याच्या कचाट्यात आणण्याची गर्जना करणाऱ्या निंबाळकरांच्या हद्दीत मटका, गुटखा, ताडी या धंद्यांना तर उत आला असून औद्योगिक वसाहतीतही चोऱ्यांच्या घटनामुळे उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर आहे. अगदी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर “टिपटॉप’पणे सुरू असलेल्या मटका अड्डयावरही कारवाई करताना पोलिसांच्या हाताला थरकाप सुटत असल्याचे वास्तव आहे. पोलीस ठाणे परिसरातील ही अवस्था असेल तर शहराचा अंदाज न घेतलेलाच बरा, अशी चर्चा सुरू आहे.
त्यामुळे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी सातारकरांच्या सुरक्षेसाठी एक पाऊल पुढे टाकून शहरच्या कारभाऱ्यांच्या कामाचे मूल्यांकन करण्याची गरज आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारभाऱ्यांनी जुन्या कर्मचाऱ्यांकडून शहराची माहिती घेत कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर आहे.
सेकंड “टॉप’ला अन् फर्स्ट “रिव्हर्स’ला
सातारा शहर पोलीस ठाण्याला बऱ्याच वर्षांनी दोन पोलीस निरीक्षकांची नेमणूक करण्यात आल्याने कायदा व सुव्यवस्थेची घडी चांगली बसेल अशी आशा होती. मात्र, तसे होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. परंतु, दुय्यम अधिकारी असलेल्या पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर या ऍक्टिव्ह मोडवर तर कारभारी निंबाळकर हे रिव्हर्स मोडवर असल्याचे दिसून येत असल्याने “सेकंड टॉपला अन् फर्स्ट रिव्हर्स’ला असल्याची चर्चा पोलीस दलातच सुरू आहे.
================