मोहित देवधर
खंडाळा – पारगाव खंडाळा व परिसरात दिवसेंदिवस चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत आहेत. त्यातून खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांना चोरट्यांकडून टार्गेट केले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून तर चोरट्यांनी बंद घरांवर निशाणा साधत गावोगावी अक्षरशः धुडगूस घातला आहे.
सप्टेंबर महिन्यात खंडाळ्यात एकाच दिवशी चोरट्यांनी जवळपास पाच बंद घरे फोडली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात घाटदरे या ठिकाणीही चोरी झाली. बावडा या ठिकाणी एका रात्रीत तब्बल आठ बंद घरे फोडली गेली. एवढेच नाही तर खंडाळा येथील गणेश मंदिरातील दानपेटीची चोरी, महामार्गानजिक वृद्धेसोबत झालेले चेन स्नॅचिंग, अंडी व्यवसायिकाच्याही गाडीतून लांबवली गेलेली पैशाची पिशवी, असे अनेक प्रकार नित्यनियमाने घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील बऱ्यापैकी घटनांमध्ये घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैदही झाले. परंतू खंडाळा पोलीस चोरट्यांचा शोध घेण्यात वारंवार अयशस्वी ठरत आहेत.
एकीकडे खंडाळा पोलिसांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये समाधानही आहे. यामध्ये महाविद्यालयाबाहेर गर्दीच्या वेळी पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याने परिसरात तरुणांमधील भांडणाचे प्रकार बहुतांश बंद झाले आहेत. आठवडा बाजारातही प्रत्येक चौकात पोलीस कर्मचारी तैनात असतात. त्यामुळे विशिष्ट मंडळींकडून शेतकरी व विक्रेत्यांना होणारा त्रासही कमी होताना दिसत आहे. बसस्थानकावरही सकाळी व संध्याकाळी पोलीस कर्मचारी हजर असल्याने छेडछाडीच्या घटनांनाही आळा बसत आहे. मात्र एवढे सगळे चांगले नियोजन करून चोरी, घरफोड्यांसारख्या प्रकारांचा तपास लागत नसल्याने दिवसेंदिवस खंडाळा पोलिसांवरील नागरिकांचा रोष वाढत चाललेला दिसत आहे.
यामध्ये काही प्रकारांमध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी अशी काहीशी पीडित नागरिकांची व्यथा झाल्याचे बोलले जात आहे. कारण एकतर चोरी होते, आर्थिक बुर्दंड सहन करावा लागतो. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी व तपास कामी चौकीमध्ये हेलपाटे मारावे लागतात आणि दुसरीकडे चोरटे मात्र बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे.
खंडाळा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांची स्थिती (दि. 1 जानेवारी 2023 पासून) अशी : घरफोडी – एकूण – 8 घटना, उघड- 2, तपास सुरू – 6 (25). चोरी – एकूण- 18 घटना, उघड- 5, तपास सुरू – 13 (27). अशा प्रकारे तपासातील यशाची टक्केवारी पाहून परिस्थितीची गंभीरता लक्षात येते.
सुस्तावलेपणाची कारणे
अधिकारी व कर्मचारी यांच्यात नसलेला योग्य समन्वय, डी.बी. पथकाचा अभाव, रात्रगस्तीसाठी अपुरे मनुष्यबळ. कामाचा ताण अन् तपासावर दुर्लक्ष. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्याचे स्वरूप पाहून तो संबंधीत पोलीस अंमलदार, अधिकाऱ्यांकडे तपासासाठी वर्ग केला जातो. त्या गुन्ह्यांचा तपास करत असताना सण-उत्सव, नेत्यांचे दौरे, आंदोलने, मोर्चे, बंदोबस्त अशा अनेक प्रकारच्या कामांचा ताण पोलिसांवर येतो. त्यामुळे तपासाला म्हणावा तेवढा वेळ त्यांना देता येत नाही. एका कर्मचाऱ्याकडे अनेक गुन्हे असल्याचाही परिणाम या प्रक्रियेवर होत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात दबक्या आवाजात आहे.