संतोष पवार
सातारा -उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसमर्धील दिग्गजांची फौज असल्याचे नुकत्याच झालेल्या मेळाव्यातून स्पष्ट झाले आहे. आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. मकरंद पाटील यांची मजबूत पकड असून दिवाळीनंतर दोघेही जिल्ह्याचा दौरा करुन पक्ष आणखी मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शरद पवार गटाचीही मोर्चेबांधणी सुरु असली तरी सध्या तरी जिल्ह्यात अजित पवार यांचा गट सरस ठरण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील घडामोडीनंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले. दिग्गज नेते विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा राष्ट्रवादीला भगदाड पडले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांनी सातारा जिल्ह्यावर नेहमीच भरभरुन प्रेम केले. बारामतीप्रमाणे सातारा जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पक्ष एकसंघ असताना जिल्हा मजबूत बालेकिल्ला होता. सध्याही जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चांगले वातावरण होते.
मात्र, पक्षांतर्गत धुसफूस कायम राहिली आहे. जिल्ह्यातील तीन दिग्गज अजित पवार यांच्या गळाला लागले आहेत. धुरंधर राजकारणी रामराजे यांनी एकप्रकारे जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्हा बॅंकेवर त्यांचीच मजबूत पकड आहे. फलटण मतदारसंघही ताब्यात आहे. मतदारसंघातील सहकारी संस्थांवर त्यांचेच अधिराज्य आहे. वाई मतदारसंघात मकरंद पाटील यांचे वर्चस्व असून किसन वीर व खंडाळा कारखाना तसेच सहकारी संस्थांवर त्यांची मजबूत पकड आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघावर अजित पवार गटाचे पूर्ण वर्चस्व आहे.
खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांची राष्ट्रवादी वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अनेक जुने कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत. आ. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबवडे येथे खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याने शरद पवार यांच्या गटाला उर्जा मिळाली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास उपस्थिती लावली. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. या मेळाव्यास होते त्यातील अनेक दिग्गज अजित पवार गटाच्या जिल्हास्तरीय मेळाव्यास उपस्थित होते. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात राष्ट्रवादीचा अजित पवार गट सरस असल्याचे दिसत आहे. आता तर दिवाळीनंतर आ. रामराजे व आ. मकरंद पाटील, जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर जिल्हाभर दौरे काढणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आहे.
अमित कदमांच्या निवडीने “पॅच अप’
अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी जावळीचे अमित कदम व खटावचे नंदकुमार मोरे यांच्यात चुरस होती. मात्र, ऐनवेळी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे अमित कदम नाराज असल्याची चर्चा होती. ही बाब अजित पवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर अजित पवार यांच्या सूचनेनुसार अमित कदम यांच्यावर जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अमित कदम यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार गट फलटण, वाई नंतर जावळी- सातारा मतदारसंघातही भक्कम होणार आहे. कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, माण मतदारसंघात पक्षाच्यावतीने विशेष लक्ष देण्यात येणार आहे.