फलटण (प्रतिनिधी) – ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी आपल्या वाहनांना रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक असून रिप्लेक्टर नसलेल्या वाहनांकडून एखादा अपघात झाला तर त्या वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिला.
साखरवाडी (ता. फलटण) येथील श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्यावतीने वाहनतळावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्याची मोहीम आजपासून सुरू करण्यात आली. वाहन चालकांना मार्गदर्शन करताना महाडिक बोलत होते.
ते म्हणाले, “”ट्रॅक्टरमध्ये टेपरेकॉर्डर कर्णकर्कश्य आवाजात सुरू असल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांच्या हॉर्नचा आवाज वाहन चालकाला येत नसल्याने तालुक्यामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये टेपरेकॉर्डर सुरू ठेवलेला आढळला तर अशा वाहनचालकांवर सुद्धा गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप, एचआर विराज जोशी, केन सुपरवायझर एस. के. भोसले, सुरक्षा अधिकारी अजय कदम, सोनू भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक हुलगे, सहाय्यक पोलीस फौजदार मोहन हंगे, हवालदार पिसे, देवकर, अडसूळ, पोलीस नाईक मदने, काकडे, खरात, वाहतूक शाखेचे व निर्भया पथकातील कर्मचारी उपस्थित होते