जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान
सातारा – गांधी जयंतीनिमित्त आज क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजोग कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, डॉ. सुधीर बक्षी, डॉ. विजया जगताप, डॉ. शेखर कारंजकर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या सुरेखा चव्हाण, सुरक्षारक्षक व कर्मचाऱ्यांनी सकाळी 10 ते 12.30 या वेळेत जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पडलेल्या पाण्याच्या मोकळ्या बाटल्या, इतर प्लॅस्टिक कचरा, कागद आदी कचरा गोळा केला. त्यानंतर रुग्णालयात स्वच्छता करण्यात आली.
डॉ. संजोग कदम म्हणाले, शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ ठेवणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून रुग्ण व त्यांचे नातेवाईक येतात. रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयाचा परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. पाण्याच्या मोकळ्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या आवारात न फेकता कचराकुंडीत टाकाव्यात असे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल आणि त्यांच्या कार्यालयातील दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी सकाळी सात ते दहा या वेळेत श्रमदान केले. सिंघल मॅडम हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरल्या. कार्यालयाचा परिसर झाडून चकचकीत करण्यात आला. सिंगल यूज प्लॅस्टिकच्या वस्तू मोडीत काढण्यात आल्या. सातारा पालिकेच्या टिपरमध्ये भंगार व कचरा टाकून सोनगाव येथे कचरा डेपोकडे रवाना करण्यात आला.
तत्पूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेतही प्लॅस्टिकमुक्तीचा गजर झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या सक्रिय सहभागातून संपूर्ण इमारतीत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. जिल्ह्यातील 1416 ग्रामपंचायतींनी प्लॅस्टिकमुक्तीची घोषणा करत त्या वस्तू हद्दपार केल्या.
स्वच्छता मोहिमेत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, कर्मचारी सहभागी
सातारा – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्यावतीने महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानात सातारा शहरातून पालिकेच्या आरोग्य विभागाने 81 टन कचरा गोळा केला.
या मोहिमाचे नेतृत्व मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केले. तत्पूर्वी नगराध्यक्ष माधवी कदम आणि पालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सातारा पालिकेत सकाळी सात ते साडेदहा या वेळेत 451 कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले. पालिकेची इमारत स्वच्छ करण्यात आली. भंगार व प्लॅस्टिक साहित्य मोडीत काढण्यात आले. तळमजल्याची विशेष स्वच्छता करण्यात आली. पालिकेच्या जुन्या व नव्या प्रवेशद्वारावर पिंकदाणी झाली होती. तो भाग घासून पुसून स्वच्छ करण्यात आला.