खा. रणजितसिंह निंबाळकर; बिजवडीत नूतन सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
दहिवडी – दुष्काळी माण-खटाव तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या उरमोडी,जिहे-कटापूर आदी सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी स्व. खा. हिंदुराव ना.निंबाळकर यांनी विविध आंदोलने, पदयात्रा काढत या सिंचन योजनांसाठी पाया रचण्याचे काम केले होते. तर त्यावर कळस चढवत योजना मार्गी लावत शिवारात पाणी पोहचवण्याचे काम माण-खटावचे जलनायक आमदार जयकुमार गोरे यांनी केले असल्याचे प्रतिपादन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
बिजवडी, ता. माण येथील नवनिर्वाचित सरपंच सौ. राधिका शिनगारे व नूतन ग्रा. पं.सदस्यांचा सत्कार त्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जयकुमार शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय भोसले, माण खटाव विधानसभा अध्यक्ष सोमनाथ भोसले, बाजार समितीचे माजी सभापती तुकाराम भोसले, विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन सौ. रूक्मिणी भोसले, संचालक संजय दा.भोसले, विठ्ठलराव भोसले, दिलीपराव भोसले, संदीप भोसले, नवनाथ शिंगाडे, सरपंच रोहिदास राऊत, सरपंच किरण बरकडे आदी प्रमुख उपस्थित होते.
खा.निंबाळकर म्हणाले, सन 1996 ला स्व. भाऊंना व सन 2019 ला मला खासदार करण्यात माण खटावच्या जनतेचा सिंहाचा वाटा आहे ते मी कदापि विसरणार नाही. या भागातला पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मी व आमदार जयाभाऊंनी मोठ्या ताकदीने कामाला लागलो होतो. जिहे-कटापूरसाठी निधी कमी पडत होता. त्यावेळी आ. जयाभाऊ गोरे, आ. राहुल कूल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याकडे गेलो. त्यांना स्व.लक्ष्मणराव इनामदार सिंचन योजनेला निधी कमी पडतोय हे सांगितल्यानंतर त्यांनी योजना समजून घेऊन तात्काळ भरीव निधी दिला. त्यामुळे आता तुमचा भागही पाण्यापासून वंचित राहत नाही.
सोमनाथ भोसले म्हणाले, स्व. खा. हिंदूराव ना. निंबाळकर यांची फलटण एवढीच माणसाठी तळमळ होती. जिहे कटापूर योजनेचा पाया त्यांनी रचला असून त्यांच्या मुलाने खा. रणजितसिंह ना.निंबाळकर यांनी या योजनेसाठी आ. जयकुमार गोरेंच्या साथीने केंद्रातून पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून 550 कोटी रूपये निधी आणण्याचे मोठे काम केले आहे. यावेळी खासदार फंडातून बिजवडीसाठी जास्तीत जास्त निधी देण्याचीही मागणी त्यांनी केली.
संजय भोसले म्हणाले, माण तालुक्यातील सिंचन योजनेचे खरे जनक स्व. खा. हिंदूराव ना.निंबाळकर होते. पाण्यासाठी त्यांनी केलेल्या मोठ्या आंदोलनात आम्हीही सहभागी होतो. बिजवडी ग्रा. पं. निवडणुकीत जनविकास आघाडीने ग्राम विकास पॅनेलचा धुव्वा उडवला आहे. पराभव सहन होत नसल्याने विरोधक अजूनही मशीनच्या नावाने बोंबा मारत आहेत. ईव्हीएम मशीन हॅंग झाली नसून पराभवामुळे तेच हॅंग झाले आहेत. ग्रा.पं.सदस्य अमित भोसले यांनी आभार मानले.