धुळदेव येथील शेतकर्यांचे रास्ता रोको आंदोलन
सातारा-पंढरपूर महामार्गासाठी झालेल्या भूसंपदनाच्या मोबदल्यापासून वंचित
म्हसवड – सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 448 मुळे बाधित झालेल्या धुळदेव, ता. माण येथील शेतकर्यांना भूसंपादन कार्यालयाकडून तातडीने मोबदला मिळावा, या मागणीसाठी पंढरपूर-सातारा महामार्गावर शेतकर्यांनी गुरुवारी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला होता. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, धुळदेव येथील पंधरा शेतकर्यांच्या दहा एकर जमिनीतून महामार्ग गेला आहे. मात्र, या शेतकर्यांना अद्याप कोणताही मोबदला मिळालेला नाही.
यासंदर्भात मागासवर्गीय शेतकरी वसंत महादेव खाडे यांनी दहिवडीचे प्रांताधिकारी आणि भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वेळोवेळी अर्ज करूनही दखल घेण्यात आलेली नाही. प्रांताधिकारी कार्यालयात 5 एप्रिल रोजी समक्ष अर्ज दिला असता, दोन महिन्यांत मोबदला देण्याचे आश्वासन प्रांताधिकार्यांनी दिले होते. त्यानंतर त्यांनीही याकडे डोळेझाक केली.
अनेक वेळा उपोषण करूनही, अधिकार्यांनी आश्वासन दिले; परंतु तोडगा काढला नाही. वसंत खाडे यांच्या मालकीच्या गट नंबर 503, 504, 396 मधून महामार्ग गेला असून, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रत्येक वेळी अधिकारी वर्गाने मोबदल्याचे नुसते गाजर दाखवून शेतकर्यांना झुलवत ठेवले आहे. पाच वर्षे होऊनही मोबदला न दिल्याने शेतकर्यांनी महामार्गावर धुळदेव येथे एक तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि विभूते यांनी शेतकर्यांशी चर्चा केली. त्यांनी प्रांताधिकार्यांशी फोनवरून संपर्क केल्यानंतर, उद्या, दि. 22 रोजी शेतकर्यांना दहिवडी येथे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर शेतकर्यांनी आंदोलन मागे घेतले.