सातारा – गडचिरोलीसारख्या ठिकाणी काम करून आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा असलेल्या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली. सातारा जिल्ह्याचे राजकीय तसेच ऐतिहासिक महत्व फार मोठे असल्याने तसेच क्रांतीकारी जिल्हा असल्याने इथे काम करण्याचे मोठे आव्हान समोर होते. मात्र, या जिल्ह्याची माती अन् माणसं खूप प्रेमळ तसेच कामाची कदर करणारे असल्याने काम करताना खूप आनंद मिळाला.
इथली माणसं, निसर्गासह प्रत्येक गोष्ट काही ना काही शिकवणारी असून वैयक्तीक मला सातारा जिल्ह्याने खूप काही शिकवल्याचे मावळते पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले. पोलीस करमणूक केंद्रात शनिवारी त्यांना निरोप देण्यात आला. नवे पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे स्वागत करण्यात आले. तेव्हा बन्सल बोलत होते. यावेळी एसपी समीर शेख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री. बन्सल म्हणाले, “सातारा जिल्हा क्रांती घडवणारा जिल्हा असून इतिहासात या जिल्ह्याचे मोठे स्थान असल्याने इथे काम करताना वेगळा अनुभव मिळतो. जिल्ह्यातील राजकारण, समाजकारण, माध्यमं तसेच विविध संघटनांसह पोलीस दलातील अमंलदारापासून ते अप्पर पोलीस अधीक्षकांपर्यंत सगळ्यांनी मोलाचे सहकार्य केले. म्हणूनच चांगले काम करता आले व जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांसाठी पोलीस दलाला सदैव तत्पर ठेवता आले.
या जिल्ह्यात एसपी म्हणून जितकं शिकायला मिळाले त्याहून अधिक माणूस म्हणून शिकायला मिळाले.” भविष्यातील वाटचालीत साताऱ्यात मिळालेले अनुभव नक्कीच दिशादर्शक ठरतील, असा विश्वास बन्सल यांनी व्यक्त केला. नवनियुक्त एसपी समीर शेख म्हणाले, “सातारा जिल्ह्यात मी यापूर्वी काम केले असून इथे काम करताना नवी प्रेरणा मिळते. अजयकुमार बन्सल यांनी जिल्ह्यात उत्कृष्ट काम केले असून त्यांनी पोलीस दलाचा जनमानसात वाढवलेला विश्वास कायम ठेवण्याचे काम माझ्याकडून केले जाईल.
बन्सल यांनी साताऱ्याप्रमाणे गडचिरोली येथे केलेल्या उत्कृष्ट कामाचा फायदा मला तिथे झाला.जिल्ह्यात यापूर्वी काम केले असल्याने बऱ्यापैकी जिल्ह्यातील परिस्थिती मला माहिती आहे. जिल्ह्याचा लौकीक मोठा असून त्याला बाधा आणणाऱ्या प्रत्येकाला कायद्याच्या कचाट्यात आणून त्याच्यावर कारवाई केली जाईल.” समाजातील शांतता भंग करून दहशत माजवणाऱ्या,गुंडगिरी करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नसून अशा लोकांसाठी एसपी कार्यालयाचे दरवाजे कायम बंद राहतील, असा इशारा समीर शेख यांनी दिला. यावेळी जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांनी अजयकुमार बन्सल व समीर शेख यांच्या कार्याची माहिती देऊन नव्या एसपींसोबत राहून काम करण्याची ग्वाही दिली.