सातारा- मिठाईची विकरी मास्क घालून करायची आणि मास्क घालून न येणाऱ्या ग्राहकाला मिठाई विक्री करायची नाही, असा निर्णय शहरातील मिठाई व्यापारी संघटनेने मंगळवारी घेतला. करोनाला रोखण्यासाठी “सवयभान’ अभियानाद्वारे आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
“मीच माझ्या सातारकरांचा रक्षक’ या संघटनेने साताराच्या हितार्थ करोना या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये आणि करोनाबरोबर दैनंदिन व्यवहार चालू ठेऊन जगायला शिकलेच पाहिजे, यासाठी सातारा मध्ये “सवयभान’ अभियान राबविण्यास सुरवात केली असून या अभियानास लोकांमधून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
याच अभियानाअंतर्गत मंगळवारी मिठाई व्यापाऱ्यांचे डॉ. जयदीप रेवले व पोलिसांच्या वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शेलार यांनी करोनाविषयी प्रबोधन व मार्गदर्शन केले. यावेळी “मीच माझ्या साताकारांचा रक्षक’चे संस्थापक राजेंद्र चोरगे, अध्यक्ष वसंतशेठ जोशी, जयेंद्र चव्हाण, सचिव मनोज देशमुख व सदस्य यशवंत गायकवाड यांनी मिठाई ग्रुपला व्यवसायाच्या ठिकाणी मास्क आणि “सवयभान’चे नियम किती महत्वाचे आहेत हे पटवून सांगितले.
“मीच माझ्या सातारकरांचा रक्षक ग्रुप’च्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सातारा मिठाई संघटनेचे अध्यक्ष भंवरशेठ राजपुरोहित आणि भरतशेठ राऊत यांच्या उपस्थितीत सर्व मिठाई व्यापाऱ्यांनी एकमताने सातारच्या आणि स्वतःच्या सुरक्षतेसाठी “नो मास्क, नो मिठाई” असा निर्णय घेतला आहे. मिठाई व्यावसायिकांचा आदर्श सर्व प्रकारच्या व्यावसायकांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी श्री. चोरगे यांनी केले.