कोरेगाव – सातारा ते लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम शहरात सुरु असून अवजड यंत्रसामुग्रीमुळे जलवाहिन्या फुटल्या अहेत. नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे व नगरपंचायत प्रशासन संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई करत नाहीत. गेल्या चार दिवसांपासून आझाद चौक, कळकाई, बाजारपेठ रस्ता, हुतात्मा स्मारक परिसरात पाणीपुरवठा झाला नाही. पाणीपुरवठा न होण्यास नगरपंचायत जबाबदार असून, नागरिकांना घेऊन नगरपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांसह पक्षसंघटनेतील पदाधिकार्यांनी दिला.
महामार्गाचा ठेकेदार मनमानीपणा करत काम करत असून जलवाहिन्या जागोजागी फोडल्या आहेत. नगरपंचायत प्रशासन त्याबाबत ब्र शब्द काढत नाही, याचे विशेष वाटत आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असून त्यातच पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. नगरसेवक हेमंत बर्गे, कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रीतम बर्गे व सामाजिक कार्यकर्ते दिनेश सणस यांनी प्रभागातील पाणी पुरवठा होत नसल्याने झालेली परिस्थिती माध्यमांच्या निदर्शनास आणून दिली. नगरपंचायतीने पाणी- पुरवठ्यामध्ये समाधानकारक बदल न केल्यास नजिकच्या काळात नगरपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.