म्हसवड – सध्या सामाजिक आणि राजकीय लोकशाहीच्या यशापयशाबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंकाकुशंकानी गर्दी केली आहे. देशाच सार्वभौमत्व पाहता आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. जनता सार्वभौम आहे, याची जाणीव आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांना करून देण्याची वेळ समीप आली आहे. हा देश शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारा व शरद पवार यांना मानणारा हा मतदारसंघ असून यंदा या लोकसभा निवडणुकीत निश्चित परिवर्तन घडेल. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी केले.
माढा लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित सवांद दौरयात करमाळा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अभयसिंह जगताप म्हणाले, माढा लोकसभेसाठी उमेदवारीसाठी नव्हे तर विचारांची लढाई आहे. यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा या उदात्त हेतूने हे शिवधनुष्य मी हाती घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या उमेदवाराला लोकसभेसाठी उभा करेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी एक कार्यकर्ता या नात्याने मी घेत असून करमाळा, माढा, सांगोला, फलटण माळशिरस, माण खटाव या मतदार संघात इंडिया आघाडीला मानणारा मतदार बांधव प्रचंड प्रमाणात असून स्व हितासाठी नेते मंडळी इतर पक्षांत गेली असली तरी सामान्य जनता मात्र आज ही पवार यांच्या पाठीशी भक्कम असल्याने माढा लोकसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे.
लोकशाही कल्पनेच्यामागे कायद्याचे अधिराज्य, नैसर्गिक हक्क, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही गतिमान तत्त्वे आहेत. त्याला तिलांजली सध्या मिळत आहे. सामाजिक लोकशाहीचा पाया खंबीर केला तरच राजकीय लोकशाही टिकेल. स्वातंत्र्य, समता व बंधुता या तीन जीवनतत्त्वातील एक तत्त्व गळाले तरी सर्व लोकशाहीचा हेतूच विफल झाल्यासारखे होते.
राजकारणातील विशिष्ट लोकांचा दरारा व मक्तेदारी तसेच सामाजिक विषमता हे दृश्य पालटले पाहिजे. असे झाले नाही तर विषमतेची झळ लागलेला वर्ग राजकीय लोकशाहीचे कवच फोडून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देशाची अर्थव्यवस्था व लोकशाही खिळखिळी बनवणाऱ्या मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला बेकारी, महागाईच्या खाईत लोटले आहे. सर्वसामान्य जनतेला आधार देत व देश वाचविण्यासाठी दुसरा स्वातंत्र्य लढा उभारण्याची गरज असल्याचे मत अभयसिंह जगताप यांनी व्यक्त केले.