सातारा – नवी दिल्लीच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि एनसीईआरटी तसेच मुंबईतील प्राथमिक शिक्षण परिषद आणि राज्य शैक्षणिक संशोधन परिषद (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांमधील तालवाद्य वादन राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मुलांमध्ये तबला वादक चैतन्य पटवर्धन आणि मुलींमध्ये तबला वादक मृण्मयी भुते यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
सातारा येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत चैतन्य आणि मृण्मयी या दोघांनी प्रथम क्रमांक मिळवला. ते राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. राज्यस्तरीय स्पर्धा दि. २२ नोव्हेंबरला पुणे येथे झाली आणि हे दोघे आपापल्या गटात विजेते ठरले. दिल्लीला होणाऱया राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. मुलांच्या गटातील स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. चैतन्यला विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला.
चैतन्य आणि मृण्मयी दोघेही येथील न्यु इंग्लिश स्कूलमध्ये नववीमध्ये शिकत असून सातारा येथील ज्येष्ठ तबलावादक आणि गुरु सुधीर पाध्ये यांच्याकडे वयाच्या आठव्या वर्षापासून शिकत आहेत. यापूर्वीही दोघांनी गुरूवर्य कंठे महाराज स्पर्धा संभाजी नगर, दादर मांटूंगा कल्चरल सेंटर मुंबई अशा अनेक नामांकित स्पर्धेमध्ये भाग घेऊन बक्षीसे मिळवली आहेत. या यशाबद्दल दोघांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.