सातारा – सातारा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) सन्मानाची वागणूक मिळत नसून आम्हाला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप जावळी तालुकाध्यक्ष साधू चिकणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे. महायुतीच्या भेदभावाबाबत पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे श्री. चिकणे यांनी पत्रकात म्हटले आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात साधू चिकणे यांनी म्हटले आहे की, सातारा लोकसभा मतदारसंघाची महायुतीची उमेदवारी उदयनराजे भोसले यांना जाहीर होऊन त्यांनी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला. मात्र, याच महायुतीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) सातारा विधानसभा मतदारसंघातील भाजप नेतृत्वाकडून विश्वासात घेतले जात नाही. याचा फटका महायुतीच्या उमेदवारास बसण्याचा धोका आहे. राज्यात महायुती एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढवत आहे. मात्र, सातारा व जावळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास याठिकाणचे भाजप नेतृत्व विश्वासात घेत नाही .याबाबत पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करून देखील अद्याप दोन्ही तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप श्री. चिकणे यांनी केला आहे.
एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे जावळी तालुक्यातील भूमिपुत्र आहेत. त्यांच्याबाबत स्थानिक मतदारांमध्ये सहानुभूतीचे वातावरण असताना भाजप नेतृत्वास जावळी तालुक्यात अधिकचे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मात्र, भाजप नेतृत्वाकडून हे होताना दिसून येत नाही. याचा प्रत्यय शेंद्रे येथील महायुतीच्या मेळाव्यात देखील पाहायला मिळाला. तरी देखील भाजप नेतृत्वाकडून राष्ट्रवादी सातारा तालुकाध्यक्ष, जावळी तालुकाध्यक्ष तसेच दोन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी कोणताही सुसंवाद केला जात नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात न घेतल्यास यापुढील कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सहभागी होणार नाही, असा इशारा साधू चिकणे यांनी दिला आहे.