राजगुरूनगर – पिस्तुल बाळगण्याचा पोलिसांकडून रीतसर परवाना मिळावा यासाठी आधार म्हणून थेट जीवघेणा हल्ला झाल्याचा बेबनाव खेड तालुक्यातील एका गावातील नवनिर्वाचित सरपंचाने केल्याच्या प्रकाराची संबंधित गावासह तालुक्यात चर्चा सुरु आहे.
तालुक्यातील एका गावात अटीतटीच्या निवडणुकीत वाद निर्माण झाले होते. अशा स्थितीत सरपंच झाल्यावर रिस्क नको म्हणून सुरक्षेसाठी अगोदर पिस्तुल परवाना मागणी अर्ज संबंधित व्यक्तीने दाखल केला होता. त्याला पुष्टी मिळावी म्हणून हा बनाव पुढे करण्यात आला असावा असे गाव परिसरात बोलले जात आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी गावातील व परिसरातील अनेकांना चौकशीसाठी बोलावून नाहक त्रास दिला. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचा रंग देण्यात आल्याने काही जण अजूनही आपल्यावर काही बालंट येईल या भीतीने ग्रासलेले आहेत.
एखाद्या नेत्यांच्या दबावाखाली पोलीस काम करीत असतील तर येथे सर्वसामान्य व्यक्तीला न्याय कसा मिळणार असा प्रश्न खेड पोलिसांबद्दल निर्माण झाला आहे. या प्रकारातील सत्य समोर यावे व दोषींवर कारवाई व्हावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे. चर्चेमुळे व वृत्त प्रसिद्धी मुळे पोलिसांकडून डमी आरोपी उभे करून हा प्रकार गपगार होऊ शकतो अशी भिती देखील काही जण व्यक्त करीत आहेत. मात्र या सरपंचाला सहकार्य करावे असा मोठ्या नेत्यांचा सांगावा असल्याने पोलिसांवर दबाव आहे.
खेड तालुक्यातील एका गावच्या सरपंचावर सप्टेंबर महिन्यात रात्री आडबाजूला रस्त्यावर खुनी हल्ला झाला. खेड पोलिसांत त्याची तक्रार दाखल आहे. सरपंच व त्यांचे एक सहकारी रात्री दहा वाजता अरुंद रस्त्यावरून त्यांच्या चारचाकी गाडीने घरी येत होते. अचानक समोरून दोन दुचाकी आल्या. त्या आडव्या लावुन तोंड बांधलेले चार जण जवळ आले. त्यांनी दगडाने काच फोडून पिस्तुल रोखले. मात्र चारचाकी वेगात पळवुन सरपंचाने सुटका करून घेतली. असे तक्रारीत म्हटले होते.
या प्रकारात कोणाला साधे खरचटले सुद्धा नाही. शिवाय हल्लेखोर फक्त काच फोडुन शांतपणे निघुन गेले का? रात्री दहा वाजता घटना घडली, मात्र लोकवस्ती असलेल्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी ही वाहने पाहिली नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. गेले अडीच महिने तपास केला, मात्र पोलिसांना आक्षेपार्ह काहीच मिळुन आलेले नाही. त्याबाबत पोलीस काही सांगत नाहीत. मुळात आपल्या जीवाला धोका संभवतो हे दाखवण्यासाठी सरपंचाने हा बनाव केला होता असे लोक तेव्हापासून आतापर्यंत याप्रकरणी बोलत आहेत.
खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांनी सांगितले, संबंधित प्रकरणाचा तपास अद्यापही सुरु आहे. अडीच महिन्यात कोणत्याही प्रकारचे धागेदोरे मिळालेले नाहीत. मात्र म्हणून आम्ही कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचलो असे होत नाही. कोणाचाही दबाव असण्याचा प्रश्न नाही. प्रकार घडण्यापूर्वी तक्रारदाराचा पिस्तुल परवाण्यासाठी अर्ज दाखल केला असल्याचे समजते. त्याअनुषंगाने सुद्धा चौकशी होईल. लवकरच सत्य समोर येईल.