मुंबई – मराठा-कुणबी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यास स्थापन करण्यात आलेल्या “सारथी’ संस्थेत झालेल्या कोट्यवधींची अनियमिततेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल मिळाला आहे. या अहवालाचा अधिक अभ्यास करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल येत्या 10 दिवसात येणार असून त्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषदेत आमदार सतिश चव्हाण यांनी सारथी संस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना वडेट्टीवार बोलत होते. सारथी गैरव्यवहारप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने पुणे येथील सारथीच्या मुख्यालयात जाऊन या प्रकरणाची चौकशी केली होती. निंबाळकर यांनी चौकशीचा अहवाल दिला आहे. त्यानंतर या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
सारथीच्या माध्यमातून ज्या सवलती, मानधन, शिष्यवृत्त्या दिल्या जात आहेत. ते यापुढे ही तशाच कायम राहणार आहेत. या संस्थेच्या माध्यमातून पाच उद्देशांसाठी संस्था काम करते. सध्या संस्थेच्या माध्यमातून 400 विद्यार्थ्यांना सवलती दिल्या जातात. यात कोणाची ही नुकसान होणार नाही. आतापर्यंत 70 टक्के मानधन दिले गेले असून उर्वारित मानधनाचा प्रश्न पुढील दहा दिवसांत सोडविण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
नवीन संचालक मंडळ येणार
या सारथी महामंडळात व्यवस्थपकीय संचालकांविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले असतानाच. या सारथी महामंडळावर लवकरच नवीन संचालक मंडळाची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी यावेळी दिली. तसेच सारथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ओबीसी आणि वीजेएनटी समाजाच्या विकासाठी महाज्योती हे महामंडळ लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. येत्या मार्चमध्ये या संस्थेचे काम सुरु होणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.