मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापन दिन काल जल्लोषात पार पडला.वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे ठाण्यातील गडकरी रंगायथन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गेल्या काही महिन्यातील राजकीय वातावरण पाहता राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत.कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी चांगलीच टोलेबाजी केली. यादरम्यान राज यांनी नाव न घेता मुख्यमंत्रीपद जाण्यावरून उद्धव ठाकरेंना टोला लगावला. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज यांच्या या वक्तव्यावर भाष्य केले आहे.
मनसेने आतापर्यंत काय काय केलं आहे याची माहिती राज ठाकरेंनी वर्धापन दिनी कार्यकर्त्यांना दिली. भोंग्याच्या प्रकरणात महाराष्ट्रभर सतरा हजार केसेस दाखल झाल्या. मी म्हणालो ना, वाट्याला जायचं नाही. मुख्यमंत्रीपदावरून जावं लागलं” असा टोला राज ठाकरेंनी यावेळी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला होता.त्यावर बोलताना संजय राऊत यांनी ‘कुणी कुणाच्या वाट्याला गेलेलं नाही त्यांच्या वाट्याला जाण्याइतपत त्यांचा पक्ष मोठा नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रातील शिवसेनेचे सरकार आणि मुख्यमंत्रीपद का गेलं हे अख्या जगाला माहिती आहे. त्यांना जर माहिती नसेल तर त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे असा टोला यावेळी राऊत यांनी लगावला. आमचं सरकार ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून पाडण्यात आलं आणि जोडीला खोके असंही राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.