माधव विद्वांस
पाच लाख ओव्यांची रचना करणारे दासो दिगंबरपंत देशपांडे ऊर्फ “दासोपंत’ यांचे पुण्यस्मरण, (निधन 28 जानेवारी 1616 तारखेप्रमाणे, तिथी माघ वद्य षष्ठी). त्यांचा जन्म भाद्रभद वद्य अष्टमी इ. स. 1551 रोजी बिदरच्या बहामनीशाहीतील नारायण पेठ येथे झाला. दत्त संप्रदायात दासोपंती, गोसावी आणि गुरुचरित्र पंथ असे काही पंथ मानले जातात.संत कवी दासोपंत हे त्यातल्या दासोपंती पंथाचे अध्वर्यू होते. त्यांच्याच नावाने तो पंथ ओळखला जातो. या पंथाचे वैशिष्ट्य म्हणजे एकमुखी द्विभुजी दत्त हेच सद्गुरूंचे रूप मान्य केलेले आहे.
दासोपंतांची पासोडी प्रसिद्ध आहे. पासोडी म्हणजे कापडावर चित्ररूपात अध्यात्म ज्ञानाच्या विषयाची मांडणी. 40 फूट लांब आणि चार फूट रूंद अशा कापडावर पंचीकरण केलेली पासोडी दुसरीकडे कोठेही नाही. पासोडीवर सुमारे 1600 ओव्या चित्रित आहेत. चारशे वर्षांपूर्वीची ही पासोडी जीर्ण झालेली आहे. पण ती जपून ठेवण्यात आली आहे. सुबक अशी वेलबुट्टीने वेढलेली पासोडीमधील चित्रे अत्यंत भावसूचक आहेत. कवी बरोबर त्यांच्यातील चित्रकारही येथे दिसून येतो.प्रत्येक चित्रात त्या चित्राचा कार्यकारणभाव व्यक्त करणारा मजकूर योजनाबद्ध रितीने लिहिलेला दिसतो. अक्षरांची दाटी कुठेही नाही, खाडाखोड नाही असे हे नेटके चित्रमय वाङ्मय अभूतपूर्व आहे.
त्यांचे वडील बिदरच्या सुलतानाचे वतनदार होते. दासोपंतांच्या वडिलांची गोष्ट सांगितली जाते. ते नारायणपेठचे वतनदार असताना दुष्काळात त्यांनी सरकारी गोदाम सुलतानाच्या परवानगी शिवाय रयतेसाठी खुले केले त्यामुळे सुलतानाने त्याची रक्कम भरण्यास सांगितले व ती सरकारी तिजोरी भरेपर्यंत त्यांच्या मुलाला ओलीस ठेवले. ती रक्कम मुदतीत भरणे शक्य नव्हते. मात्र ती दत्ताजी पाडेवार नावाच्या एका दत्तस्वरूप विभूतीने मुदतच्या आदल्या दिवशी सुलतानाकडे दिली. दासोपंत मुक्त झाल्यामुळे सर्वांना आनंद वाटला. मात्र, दासोपंत ज्या दत्तप्रभूने आपणास वाचविले त्याचाच शोध घेण्यासाठी ते एकाएकी घरातून निघून बाहेर पडले. हिलालपूर, डाकुळगी, प्रेमपूर, नांदेडवरून ते फिरत माहूर या क्षेत्री आले. येथील निसर्गरम्य परिसरात ते रमले व 12 वर्षे येथेच राहिले. या ठिकाणी दासोपंतांनी दत्तभक्तीचा अनुभव घेतला. त्यांचे जीवन दत्तभक्तीत व्यतीत झाले.
ते तीर्थयात्रा करीत असताना अकस्मात त्यांना त्यांचे कुटुंबीय वाणीसंगम येथे पत्नीसह भेटले. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांच्या विनंतीला मान देऊन अंबेजोगाई येथे वास्तव्य करण्याचे ठरविले. दासोपंतांनी नारायणपेठ येथील आपल्या वतनाचे दानपत्र करून ते कायमचे वास्तव्यासाठी आंबेजोगाईस आले. सीतोपंत देशपांडे यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करून अंबेजोगाईस दासोपंतांची सर्व व्यवस्था लावून दिली. याच ठिकाणी दासोपंतांनी अनेक ग्रंथ लिहिले. अंबेजोगाईच्या देशपांडे गल्लीत त्यांचे 400 वर्षांपूर्वीचे जुने घर अद्यापही आहे. गीतेवरच त्यांनी 5-6 टीका लिहिल्या. त्यापैकी “गीतार्णव’ महत्त्वाची समजली जाते. त्यांचा “ग्रंथराज’ हा वेदान्तपर ग्रंथ आहे.