इस्लामपूर- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील भाविक भक्तांच्या आरोग्याचा विचार करता हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणारा संभुआप्पा-बुवाफन उरुस यावर्षी रद्द केल्याची माहिती मठाधिपती मिलिंद मठकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संभुआप्पा-बुवाफन देवस्थान ट्रस्ट व सर्व मानकांच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. संभुआप्पा-बुवाफन उरुसाची २८० वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे. इस्लामपूर शहरासह राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. गेल्या दिड महिन्यापासून याचा प्रसार जोरात झाला असून मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली आहे. सध्याचे वातावरण हे शारिरीक, मानसिक व आर्थिक दृष्टीकोनातून गंभीर आहे. सध्या काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी हिवाळ्यामध्ये कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. यंदा नोव्हेंबर महिन्याच्या २६ तारखेपासून ते १० डिसेंबरपर्यंत पर्यत संभूआप्पाचा उरूस होता.
उरूस तब्बल पंधरा दिवस असतो. उरुसामध्ये कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलढाल होत असते. उरूसामध्ये सर्वसाधारण पणे १५ दिवसात लाखांच्या घरात माणसांची रेलचेल असते. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातूनही भाविक, अनेक छोटेमोठे व्यापारी, फिरस्ते, करमणुकीचे खेळ, जनावरांच्या बाजारामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे विविध भागातून आलेल्या लोकांचा संपर्क वाढून कोरोना प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन देवस्थान ट्रस्टने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
संभुआप्पा मंदिरामधील मंडप चढवणे, गल्लफ व दंडवत घालणे, फकीर होणे यासह सर्व धार्मिक कार्यक्रम होणार नाहीत. पोर्णिम दिवशी भाविकांनी दही, भात व मलिद्याचा नैवेद्य घरातूनच दाखवावा. फकीर पूजन घरीच करावे. उरूस काळात संभुआप्पाबुवाफन मंदिर बंद असणार आहे. तरी भाविक-भक्तांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन मठाधिपती मिलिंद मठकरी यांनी केले आहे.