फलाट क्रमांक सहावर अमूक ठिकाणी जाणारी रेल्वेगाडी एक तास नियोजित वेळेपेक्षा उशिरानं येईल. उद्घोषणा होताच अनेकांनी आपापलं सामान निराशेनं पुन्हा खाली ठेवलं. वैतागलेल्या प्रवाशांनी तिकीट तपासनीसाला पुन्हा गराडा घातला आणि प्रश्नांचा भडीमार सुरू केला. “साहेब, ही चौथी उद्घोषणा झाली आहे गाडी उशिरा येण्याची. आम्हाला पुढच्या गाड्या गाठायचा आहेत, रेल्वे प्रशासन पुढच्या गाड्या रोखून धरणार आहे का? आमच्या वेळेला काही किंमत आहे का नाही?’ प्रवाशांचे नेहमीचे प्रश्न आणि त्याला नेहमीची उत्तरं. रेल्वेच्या कारभारावर खरमरीत टीका आणि तिकीट तपासनीसाची तितकीच थंड प्रतिक्रिया. एका तास व्हायला काही मिनिटं शिल्लक. गाडी अजुनी उशिरा येईल अशी उद्घोषणा पुन्हा होत नाही याचं समाधान काही प्रवाशांना. नवऱ्याला, प्रियकराला सोडायला आलेल्या तरुणींना हा होत असलेला उशीर सुखावणारा, तर मुक्कामाच्या गावी नवरा वाट पाहून कंटाळला असणार या कल्पनेनी कासावीस झालेल्या सौभाग्यवती.
अखेर एक उद्घोषणा सुरू झाली- “फ्लॅट क्रमांक सहावर पाच मिनिटांत गाडी येत आहे. प्रवाशांना झालेल्या मनःस्तापाबद्दल खेद आहे. आपला प्रवास सुखाचा होवो. रिझर्व्हेशन असलेले प्रवासी शांतपणे गाडी फलाटावर येऊनही आपलं सगळं सामान बरोबर आहे ना याची खात्री करून घेतायत. ज्यांचं रिझर्व्हेशन नाही ते त्वेषानं आत घुसायचा प्रयत्न करतायत.
गाडीचा प्रवास तासाभराचा झाला आणि अंधाराची चाहूल घेत मोटरमन झालेला उशीर भरून काढण्यासाठी वेग वाढवत राहिला. चला, निदान सगळे सिग्नल तरी पटापट मिळतायत मोटरमन आणि प्रवासी या दोघांचं एकमत झालं. गाडी जंगलातून सुनसान भागातून चाललीय. काही घोरणाऱ्या प्रवाशांकडे त्रासिक नजरेनी पहात प्रवाशांनी पत्त्यांचे डाव बंद करून झोपायचा प्रयत्न सुरू केला.
रात्रीचा एक वाजलेला. मोटरमन आपल्या सांसारिक समस्यांचा विचार झटकून टाकत कामावर लक्ष केंद्रित करतोय. दुपारी त्याची झोप चांगली झाल्यानं डोळे जागे. सगळे हिरवे सिग्नल पहात मोटरमन शीळ वाजवतोय. धडक… खडक… धडक… खडक गाडी छान लयीत चाललीय. मोटरमनच लक्ष ट्रॅकवर. झालेला निम्मा उशीर तर आपण भरून काढलाय. मुक्कामी जायला अजुनी दोनशे किलोमीटर प्रवास करायचंय. ठरल्यावेळी सहा वाजता आपण नक्की टच होणार. त्यांनी मनाशी ग्वाही दिली.
ट्रॅकवरची त्याची नजर अजिबात हलत नव्हती. गाडी शंभरच्या वेगाने चालली आहे. अचानक त्याचं लक्ष ट्रॅकवर गेलं. जवळपास पाऊण किलोमीटर अंतरावर कुणीतरी हात पसरून थांबा थांबा असा इशारा करतंय. जाऊ दे आपल्याला भास होतोय असं त्याच्या मनात आलं आणि ते इशारा करणारे हात थांबले. गाडी दहा किलोमीटर पुढे आली, वेग शंभरचा एकशेवीस झाला. पुन्हा त्याला जाणवलं की, ट्रॅकवर थांबा थांबा इशारे चालू झालेत. त्यांनी गाडीचा वेग कमी केला. ट्रॅकवर तो नजर ठेवून होता. इशारे थांबलेत अशी खात्री करून घेत त्यांनी कमी केलेला वेग पूर्ववत केला. गाडी बारा किलोमीटर पुढे आली. पुन्हा इशारे चालू झाले.
आपण गाडी या जंगलात थांबवणं चुकीचं होईल आणि रखडलेले प्रवासी देखील चिडतील. नको, जात राहू आपण पुढं. गाडी आठ किलोमीटर पुढे आली. परत इशारे चालू. आता त्यांनी साफ दुर्लक्ष करायचं ठरवलं. इशारे चालू… बंद… चालू… बंद…आता एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की, इशारे चालू झाले आणि आपण गाडी पुढं दामटली तरी आपण आणि इशारे देणारे, हलणारे हात यांच्यातील अंतर कमी होत नाहीय. हे इतकावेळ आपल्या कसं लक्षात आलं नाही? त्यांनी रुमालाने चेहरा खसाखसा पुसला. मानेवर घामाचा ओघळ वाहत होता. इशारे बंद झाले होते.
आता जवळपास वीस किलोमीटरचा प्रवास त्यांनी सुखनैव केला. सुटलो आपण या भासातून, असा निःश्वास टाकत त्यांनी मनाशी म्हटलं आणि पुन्हा ट्रॅकवर हात हलायला लागले. पुन्हा हात आणि गाडी यातील अंतर तितकंच रहात होतं. आता त्याच्या अंगाला कापरं भरायला लागलं. त्यांनी गाडी थांबवली. तो खाली उतरलेला बघताच काही प्रवासीदेखील उतरले. आधीच निघायला उशीर झालेला आणि त्यात मोटरमन विनाकारण थांबलेला.
त्यांनी प्रवाशांना काय होतंय हे समजून सांगितलं. परंतु कुणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. आधी या इशाऱ्यांनी तो वैतागला होता त्यात आडमुठे प्रवासी. “काही होत नाही, चला पुढं. हवं तर रामरक्षा म्हणा’ असे शहाजोग सल्ले आले. प्रवास चालू झाला. परत तेच. आता मात्र मोटरमनने पुढं जायला ठाम विरोध केला. उत्साही प्रवासी ट्रॅकवर दोन तीनशे मीटर पुढं जाऊन बघून आले. “काही सुद्धा नाही’ अनेकांनी हात झटकत म्हटलं. मात्र एक प्रवासी इंजिनजवळ उभा राहून कसलंतरी निरीक्षण करत होता. प्रवाशांनी मोटरमनला हाक मारून बोलावलं. इंजिनाच्या हेडलाइटच्या ब्रॅकेट आणि काचेमध्ये एक फुलपाखरू अडकलं होतं आणि ते सुटकेसाठी पंख फडफडत होतं. त्याच्या फडफडणाऱ्या पंखांची सावली ट्रॅकवर पडत होती. ही हलणारी सावली मोटरमनला कुणीतरी हात करतंय असं भासवत होती. फुलपाखरू दमले की पंख हलायचे थांबायचे आणि सावली उर्फ इशारे बंद व्हायचे. गाडीच्याबरोबरच फुलपाखराचा प्रवास होत असल्यामुळे गाडी आणि सावली यातील अंतर कायम रहात होतं. प्रवासी आणि मोटरमन सत्य समजल्यावर हसायला लागले. घामानी भिजलेला रुमाल मोटरमननी पिळून टाकला आणि आपली सीट पकडली. असा वाया गेलेला वेळ पुन्हा भरून काढायची जबाबदारी मोटरमनच्या खांद्यावर येऊन पडली होती.
गाडी निघाली. वेग दहा किलोमीटर. वेग वीस किलोमीटर. वेग चाळीस किलोमीटर. मोटरमनला ट्रॅकवर काही तरी जाणवलं. त्यांनी वेग कमी कमी करत आणला आणि ब्रेक लावले. आता काय झालं पुन्हा? प्रवासी परत खाली उतरले. मोटरमन आणि प्रवासी आ वासून ट्रॅककडे पहात राहिले. गाडी थांबली तेथून शंभर मीटरवर फिश प्लेट्स निघून रूळ अस्ताव्यस्त झाले होते. मोटरमन हेड लाइटपाशी येऊन फुलपाखराचे आभार मानण्यासाठी वाकला. त्याला आभाराबरोबर फुलपाखराला श्रद्धांजली वाहावी लागली.
दीपक पारखी