बिहारच्या महागठबंधन सरकारमध्ये हिंदुस्थान अवामी मोर्चा(हम)च्या कोट्यातील मंत्री संतोषकुमार सुमन यांच्या राजीनाम्याने सरकारच्या स्थिरतेवर परिणाम झाला नसला तरी सत्तारूढ आघाडीच्या ऐक्यावर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे महागठबंधनचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आगामी 23 जूनला देशातील विरोधी पक्षांची बैठक बोलावलेली असताना आणि देशातील अनेक दिग्गज नेते दाखल होत असताना मांझी यांचा झटका विचार करायला भाग पाडणारा आहे.
पाटण्यातील बैठकीचा अजेंडा स्पष्ट आहे. केंद्रातील सत्ताधारी एनडीएविरुद्ध आगामी सार्वत्रिक निवडणुकीत मजबूत विरोधी गट तयार करण्याची महागठबंधनची इच्छा आहे. परंतु अंतर्गत कलह गुंतागुंतीचे असून संतोष यांचा राजीनामा हे एक त्याचे उदाहरण आहे. संतोष यांनी राजीनामा देताना जेडीयूमध्ये “हम’च्या विलीनीकरणाचा प्रस्ताव हे कारण सांगितले आहे. यादरम्यान, काही दिवसांपूर्वीच सुमन यांचे वडील आणि “हम’चे सर्वेसर्वा जीतनराम मांझी यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. यावरून अनेक प्रकारचे तर्क लावले गेले. अशा वेळी राजीनाम्याची घोषणा हा आश्चर्यकारक निर्णय वाटत नाही.
प्रत्यक्षात जेडीयू हा बिहार विधानसभेत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे बिहारच्या 40 लोकसभा जागांसाठी वाटप सुरू होईल, तेव्हा आपला दावा कमी पडणार नाही, यासाठी नितीशकुमार पुरेपूर काळजी घेत आहेत. त्यामुळे त्यांनी “हम’च्या विलीनीकरणाचा प्रस्ताव मांडला आहे. याआधारे जेडीयूची शक्ती कमी वाटणार नाही, असे त्यांना वाटते. यापूर्वीच्या निवडणुकीत जेडीयूला केवळ तीनच पक्षात जागावाटप करावी लागत असे.
भाजप आणि त्याच्या वाट्याला 17-17 जागा आल्या. तर लोकजनशक्ती पक्षाला सहा जागा देण्यात आल्या. तेव्हा जेडीयूने 16 जागा जिंकल्या. आता त्याने केंद्रापासून ते गावपातळीपर्यंत भूमिका बदलली आहे. त्यामुळे महागठबंधनमध्ये त्याला राजद, कॉंग्रेस, डावी आघाडी यांच्याशी चांगला मेळ बसवावा लागणार आहे आणि चांगल्या जागा पदरात पाहून घ्याव्या लागतील. याप्रमाणे “महागठबंधन’नुसार तीन लोकसभा जागा लढणारा हम पक्षाचे जेडीयूतील विलीनीकरणाचा अर्थ काढता येईल. अर्थात ही बाब जीतनराम मांझी यांना चांगलीच ठाऊक आहे.
भारतीय राजकारणात अपेक्षेप्रमाणे घडलेली घटना असून आता जातीवर आधारलेले प्रादेशिक पक्ष पुढे येऊन आपले महत्त्व सांगत आहेत. म्हणून मोठ्या पक्षांना त्यांच्याकडे कानाडोळा करता येणार नाही आणि ही बाब सोपी राहिली नाही. ही स्थिती केवळ बिहार आणि उत्तर प्रदेशातच नाही तर अनेक लहान मोठ्या राज्यातही असेच चित्र पहावयास मिळत आहे. “हम’ पक्ष एनडीएत सामील झाला तर त्यांना जेडीयूप्रमाणे जागा मिळू शकतात हे मांझी यांना चांगलेच ठाऊक आहे. कारण लोजपमध्ये विस्कळीतपणा आहे. अन्य पक्षांत भाजपवर दबाव टाकण्याची शक्ती नाही.
एकाअर्थाने राजीनामा देण्याची आणि टीका करण्याची खेळी आता प्रत्येक ठिकाणी पाहवयास मिळेल. जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येईल, तसतसे राजकारणातील घडामोडींना वेग येईल. पण सध्या नितीशकुमार आणि जेडीयूसाठी राज्यातील घटक पक्ष एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. त्याचवेळी त्यांना राजधानी दिल्लीतही आपले महत्त्वही सांगायचे आहे. कारण बिहार, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रावरच भावी महागठबंधनची वाटचाल अवलंबून आहे.
– संगीता चौधरी