मराठी नामवंत लेखकांच्या मांदियाळीत, प्रकर्षाने उठून दिसणारे व्यक्तिमत्त्व आणि वक्तृत्व गाजवलेले लेखक म्हणून प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाव घेता येईल. 13 ऑगस्ट 1898 रोजी सासवड जवळ कोंडीत खुर्द या गावी त्यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती म्हणून हा लेखनप्रपंच. एवढ्या दीर्घ कालावधीनंतरही प्र. के. अत्रे माहिती नाहीत, असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही.
आपल्या लेखनाने आणि वक्तृत्वाने अवघा महाराष्ट्र गाजविणारे एकच ते म्हणजे अत्रे. ते लेखक, कवी नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी या विविध भूमिका लिलया पेलणारे अलौकिक व्यक्तिमत्त्व. या शिवाय उत्तम विनोद बुद्धी, उत्तम शरीरयष्टी आणि ओघवते पण प्रखर विचार मांडून, श्रोत्यांना भारावून टाकण्याची कला त्यांना आत्मसात होती. आपल्या भाषणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील ते महत्त्वाचे नेते मानले गेले.
सासवडच्या वाघिरे स्कूलमध्ये त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. 1919 मध्ये फर्गसनमधून ते मॅट्रिक झाले आणि पुढे पुणे विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. त्यानंतर लंडन येथे जाऊन त्यांनी टीडी (टीचर डिप्लोमा) पूर्ण केला. याशिवाय तेथे प्रायोगिक मानसशास्त्राचा देखील अभ्यास केला.
त्यानंतर पुणे आणि मुंबई येथे त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर पुणे येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत 18 वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम करताना शाळेचा विस्तार केला. नवनवीन उपक्रम राबविले. बी.टी. परीक्षेत ते प्रथम आले. पुण्यात राजा धनराज गिरजी आणि मुलींचे आगरकर हायस्कूलची स्थापना करून त्यांनी त्या काळात स्त्री शिक्षणाच्या कार्यात महत्त्वाचे योगदान दिले. शाळांच्या क्रमिक पुस्तकांच्या लिखाणाचे त्यांनी केलेले काम हे मराठी विषयाची दिशा दर्शविणारे ठरले, इतकी ती पुस्तके लोकप्रिय ठरली. अत्र्यांनी आपले व्यक्तिमत्त्व आणि जडणघडण करताना सामाजिक बांधिलकी कायम जपली. दुर्बल घटक, गोरगरीब, उपेक्षित, दलित यांचे कैवारी म्हणून अत्रे कायम समाजात लोकप्रिय ठरले.
त्यांच्या विविधांगी लेखनाबद्दल लिहिताना झेंडूची फुले हा काव्यसंग्रह आणि कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्राचा नामोल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. कारण अत्रे हे नाव आठवले तरी ही दोन पुस्तके डोळ्यासमोर येतात. नाटककार म्हणूनही अत्र्यांनी खूप नावाजलेली, सामाजिक प्रश्न हाताळणारी नाटके लिहिली… त्यामध्ये अशी बायको हवी, घराबाहेर, उद्या चा संसार,, प्रीती संगम, बुवा तेथे बाया, ब्रह्मचारी, लग्नाची बेडी, आणि साष्टांग नमस्कार या सारखी, त्यांनाच खरोखर साष्टांग नमस्कार घालावा अशा नाटकांचा उल्लेख करता येईल..प्रभाकर पणशीकर यांच्या उत्तुंग अभिनयाने, फिरत्या रंगमंचावर प्रथम सादर झालेले आणि लखोबा लोखंडे हे नाव अजरामर करणारे अत्रे यांचे.
तो मी नव्हेच… हे आजही तितकेच लोकप्रिय आहे. याशिवाय चांगुणा, मी अत्रे बोलतोय, मी कसा झालो, सूर्यास्त, हुंदके ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तकेही मराठी साहित्याची शान वाढविणारी आहेत.
अत्रे हरहुन्नरी होते. शिक्षक, मुख्याध्यापक पदावर काम केल्यानंतर, राजकारणात जाऊन ते आमदार झाले. सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती असताना अत्र्यांच्या बोलताना म्हणाले, “ही इज अ रायटर अँड फायटर ऑफ महाराष्ट्रा’ हे खरंच आहे.
पहिल्या मराठी चित्रपटाला मिळालेल्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या… श्यामची आई… या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन अत्र्यांचं होतं. 1942 साली ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तर नाट्य आणि पत्रकार संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. त्यांच्या लेखनात निखळ विनोद, सामाजिक आशय आणि विषयाचे भान यांचे विलोभनीय मिश्रण असे. विनोद प्रधान नाटकांची सुरुवात त्यांनीच करुन, नाट्य गृहात हशा पिकवला.
अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचे आज 13 ऑगस्ट या जन्मदिनी आदरपूर्वक स्मरण… गुलाब, जाई, जुई सोडून झेंडूच्या फुलांचे नाव देऊन विडंबन काव्य करणाऱ्या या असामान्य आणि निडर व्यक्तित्त्वाला प्रणाम.
आरती मोने