गणपती ही कलेची देवता आहे. चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती म्हणजे श्रीगणेश. गणपतीला बुद्धिदाता असेही म्हणतात. गणपती हे सर्वांत लाडके लोकदैवत मानले जाते. त्यामुळेच गणेशोत्सव हा महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या सर्व सार्वजनिक उत्सवांपेक्षा धूमधडाक्यात, उत्साहात आणि आनंदात साजरा होतो. घराघरांमध्ये श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा विराजमान होतात आणि पुढचे दीड, पाच, सात, अकरा दिवस घरातील वातावरणच बदलून जाते. आपल्या घरी आलेल्या
पाहुण्याप्रमाणे बाप्पाचे स्वागत, त्याला गोडधोड पदार्थांची मेजवानी देऊन निरोप दिला जातो. गणेशोत्सवाविषयीच्या या भावना विस्ताराने मांडताहेत- अभिनेता-लेखक-दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर आणि निवेदक अभिनेता अभिजित खांडकेकर.
गणेशोत्सवाविषयी बोलताना अभिनेता-लेखक चिन्मय मांडलेकर सांगतो की, लहानपणापासून गणरायाशी माझे एक विशिष्ट नाते आहे. अगदी बालवयापासून हा उत्सव आमच्या घरात उत्साहाने साजरा होत असताना मी पाहिले आहे. आमच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. यावेळी घरामध्ये अतिशय उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते. सगळे नातेवाईक आप्तेष्ट या निमित्ताने घरी येतात आणि सगळ्यांच्या भेटीगाठी होतात.
सगळ्यांनी मिळून गणपतीची मूर्ती मोठ्या थाटात घरी आणणे, तिची प्रतिष्ठापना करणे, घरात गोडधोड करणे या सगळ्या गोष्टींमुळे मनाला खूप आनंद मिळतो. घरी दीड दिवसाचा गणपती असला तरीसुद्धा इतर नातेवाईकांकडे, आप्तेष्टांकडे मात्र पाच दिवसांचा, सात दिवसांचा गणपती असतो. त्यामुळे आमचे त्यांच्याकडे येणे-जाणे सुरू असते. या पाच-सहा दिवसांत सगळे स्नेही भेटल्यामुळे वर्षभर पुरेल इतका आनंद व समाधान मिळते. आप्तेष्टांना जवळ आणणारा, परस्परांमध्ये संवाद साधण्याचे निमित्त बनणारा आणि मांगल्यमय वातावरणातून सर्वांना आनंद देणारा हा उत्सव आहे.
माझे लहानपण जुन्या मुंबईत म्हणजे गिरगावात गेले आहे. त्यामुळे लहानपणापासूनच हा उत्सव अतिशय उत्साहात साजरा होताना मी पहात आलेलो आहे. घरच्या गणपतीबरोबरच मंडळांच्या गणपतीच्या कामातील, कार्यक्रमातील आनंद लुटलेला आहे. गणपती बसण्याच्या दिवसापासून विसर्जनापर्यंत प्रत्येक छोट्या मोठ्या कामांत माझा उत्साहाने सहभाग असायचा.
डेकोरेशन करणे किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होणे मला आवडायचे. विसर्जनाच्या मिरवणुकीतसुद्धा मी अतिशय उत्साहाने सहभागी व्हायचो. नंतरच्या काळात काम वाढत गेल्यामुळे या सर्व गोष्टी करण्यासाठी वेळ मिळत नाही. पण त्याच्या आठवणी मात्र आजही मनाला आनंद देतात. घरच्या गणपतीसाठी मी आवर्जून वेळ काढतो.
योगायोग म्हणा किंवा आणखी काही पण आतापर्यंत मिळालेल्या कामांसाठी आलेले बहुतांश फोन हे गणेशचतुर्थीच्या दिवशीच आलेले आहेत. माझी पहिली मालिका “वादळवाट’. या मालिकेसाठीची विचारणा करण्याचा फोन आला त्यादिवशी गणेश चतुर्थीच होती. खरे तर मी कुठल्याही दैवताची मूर्ती म्हणून पूजा करत नाही किंवा ती मूर्ती म्हणजे ते दैवत असे मी मानत नाही. गणपती हाही मला देव न वाटता मित्र किंवा घरात येणारा सगळ्यांना हवाहवासा वाटणारा पाहुणा वाटतो. गणपतीच्या मूर्तीमध्ये आणि त्यासंबंधीच्या पुराणातील कथांमध्ये जी प्रतीकात्मकता सांगितलेली आहे, ती प्रतीकात्मकता प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना व्यवस्थितपणे समजून सांगितली पाहिजे. त्यातून मुलांना आपण नेमके कशासाठी गणेशाचे पूजन करतो हे समजेल.
अलीकडच्या काळात गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले आहे. ते बऱ्याच अंशी व्यावसायिकीकरणाकडे झुकू लागले आहे. त्याला वेळीच आवर घातला नाही तर तो उत्सव न राहता त्याचा इव्हेन्ट व्हायला वेळ लागणार नाही. वास्तविक पाहाता हा अतिशय निरागस भावनेतून निर्माण झालेला सण आहे. त्यामागची भूमिकादेखील खूप उदात्त आणि मानवतावादी आहे. गणपती हे लोकांचे लाडके दैवत आहे; या दैवताला अर्थकारणामध्ये अडकवू नये, असे वाटते. मोठमोठ्या आवाजात स्पिकर्स लावणे, बिभित्स गाणी लावून त्यावर नाचणे, बळजबरीने वर्गणी गोळा करणे, भररस्त्यात मोठाले मंडप टाकून रस्ता अडवणे या गोष्टींना कुठेतरी प्रतिबंध केला पाहिजे. मंडळांमडळांमधील स्पर्धा ही धार्मिकतेपेक्षाही ईर्ष्येकडे झुकता कामा नये. तसेच या आनंददायी उत्सवातील सादरीकरणाचा भवतालातील लोकांना त्रास होता कामा नये. कुठलाही धार्मिक उत्सव कोणत्याही धर्माचा असो, त्याचा प्रत्येकाने मनापासून आनंद घेतलाच पाहिजे.
लोकमान्य टिळकांनी विशिष्ट उद्देशाने हा सण सुरू केला होता. लोकांनी एकत्र यावे, त्यांचे प्रबोधन व्हावे आणि देशकल्याणासाठी या एकात्मतेचा फायदा व्हावा हा त्यांचा उद्देश होता. हा उद्देश आपण विसरता कामा नये. सुजाण आणि संवेदनशील नागरिक म्हणून आपण या सणाचा मूळ उद्देश जपला पाहिजे.
विविध मराठी वाहिन्यांवरील मालिकांमुळे घराघरात पोहोचलेला अभिजित खांडकेकर हाही गणेशाचे स्वागत मोठ्या आपुलकीने करतो. अभिजित सांगतो, मी मूळचा नाशिकचा आहे. आमच्या घरी दहा दिवसांचा गणपती असतो. गणेशोत्सावाच्या काळामध्ये संपूर्ण दहा दिवस शक्य झाले नाही; तरीसुद्धा प्राणप्रतिष्ठेच्या वेळी आणि विसर्जनाच्या दिवशी मात्र मी आणि माझी पत्नी आवर्जून नाशिकला जातो. गणपती हे माझे आवडते दैवत आहे.
मला आजही गणेशागमनासाठीची सजावट करणे आणि आरास करणे आवडते. लहानपणापासूनच गणेश उत्सवाचे एक वेगळे आकर्षण माझ्या मनामध्ये आहे. त्यावेळी नाशिकला मी ज्या कॉलनीत राहायचो, तेथे सर्वाजनिक गणपती असायचा. त्यावेळच्या तरुण मंडळींनी हे गणपती मंडळ स्थापन केले होते. तो गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात व्हायचा. गणेशोत्सवामध्ये मला सर्वांत जास्त आकर्षण असायचे ते त्या निमित्ताने होणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धांचे. कारण त्यावेळी होणाऱ्या बहुतेक स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचो आणि बक्षिसही मिळवायचो. आमच्याकडे चमचा-लिंबू स्पर्धेपासून, स्लो सायकलिंग, धावणे यांसारख्या तिथल्या तिथे खेळता येतील अशा वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा व्हायच्या. पाच दिवस हा उत्सव चालायचा आणि शेवटच्या दिवशी स्पर्धेत बक्षिस मिळवणाऱ्यांना बक्षिसाचे वाटप व्हायचे. या समारंभात मिळालेले सगळे छोटे छोटे कप घेऊन मी जेव्हा घरी यायचो, तो एक आनंद वेगळाच असायचा.
आपण काहीतरी मिळवले आहे याबद्दल मनातून खूप छान वाटायचे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने काही वेळा शाळेमध्ये कथाकथन किंवा वक्तृव स्पर्धा व्हायच्या. त्यामध्ये मी भाग घ्यायचो. प्रत्येकाच्याच मनामध्ये एक प्रकारची भीती लहानपणी असते. लोकांसमोर बोलताना किंवा कुठली कला सादर करताना बरेचदा ती जाणवते. ही भीती घालविण्यासाठी मला अशा स्पर्धांचा फायदा झाला असे नक्कीच म्हणता येईल. या कार्यक्रमांचे निवेदन करण्यासाठी आमच्या शिक्षिका मला स्क्रिप्ट लिहून आणायला सांगायच्या. त्यामुळे तेव्हापासून हे गुण माझ्यामध्ये विकसित झाले असे म्हणता येईल.
गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवाचे स्वरूप खूप बदलत चालले आहे. आजकाल गणेशोत्सवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. गणपती बाप्पा हे आपण बुद्धीचे दैवत मानतो. बाप्पाने अशा प्रकारे चुकीचे वागणाऱ्या लोकांना थोडीशी जरी चांगली बुद्धी दिली तरीसुद्धा या गणेशोत्सवाचे सार्थक होईल. किमान एका मंडळाला जरी वाटले की, आपण डीजेंच्या भिंती लावण्याऐवजी ते पैसे एखाद्या सामाजिक संस्थेला दान करू, त्यातून एखादे चांगले कार्य घडू शकेल. असे झाले तर गणेशोत्सव खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे साजरा झाला असे म्हणता येईल. वास्तविक करोना काळात गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक भान जपत खूप मोठे कार्य केलेले दिसले; पण कोविडची लाट सरली आणि पुन्हा डीजेचा दणदणाट सुरू झाला.
खरंतर मी फार देव देव करणारा नाही. मी श्रावण किंवा तत्सम नियम काही पाळत नाही, उपासतापास करत नाही. पण गणेशाला आपल्या घरातील पाहुणा मानतो. त्या मातीच्या मूर्तीमध्ये आपण मंत्रोच्चार करून प्राणप्रतिष्ठा करून त्याला जणूकाही जिवंत केलेले असते. आपण या दिवसांत त्याची आरती करतो, नैवेद्य दाखवतो, त्याला गोडधोड खाऊ घालतो. त्याच्या आजूबाजूचे वातावरण कशा प्रकारे प्रसन्न राहील यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्याघरी जणूकाही नवीन पाहूणा आला आहे आणि आपण त्या पाहुण्याचे स्वागत सगळे एकत्र मिळून मोठ्या आनंदाने करतो आहोत अशा मानसिकतेत असतो. ही भावना मला अधिक भावते. प्राणप्रतिष्ठेच्या वेळी मंत्रोच्चार करताना गणेशाच्या प्रत्येक अंगामध्ये आपण जणूकाही प्राण फुंकत आहोत, ही भावना मनामध्ये घेऊन पूजा करत असतो. ही पूजा मी मनोभावे ऐकतो, दुर्वा हातात घेऊन त्या त्या अंगाला स्पर्श करून जणू काही ते अंग जिवंत होत आहे असे भाव मनात ठेवतो. यातून निर्माण होणाऱ्या लहरी खूप सकारात्मकता देतात.
– प्रतीक्षा पाटील