सकारात्मक राहायचं म्हणजे नक्की काय करायचं? आणि नेहमी नेहमी ते शक्य असतं का? तर, सकारात्मक राहायचं किंवा सकारात्मक विचार करायचा म्हणजे आपल्या समोरील परिस्थिती किंवा घडलेल्या घटनेतील काही जे चांगले असेल त्याकडे पाहून शांत राहायचं, समाधान मानायचं. पण हे असं नेहमी शक्य नसतं. खरं तर बारा महिने चोवीस तास सकारात्मकता टिकवून ठेवायला खूप साधना हवी. ती साध्य होईपर्यंत आपण काय करू शकतो ते पाहू.
आपल्याला आपला जन्म रिकाम्या ओंजळीने झालेला नाही हे एकदा समजलं, की जगण्याचा आत्मविश्वास आपोआप सापडतो. तरीही अनेक प्रसंग, घटना घडत असतात ज्यामुळे दुःख होतं, नैराश्य येतं, नकारात्मकता येते. जगू नये असेही विचार येतात… तरीही, उद्या जसा सूर्य न चुकता येणार असतो, त्याच उमेदीने आपणही नवीन दिवसाला सामोरं जायला स्वतःला तयार करायचं. कोणतीच परिस्थिती कायम राहात नाही, समस्या कायम राहात नाहीत. त्यावर आज ना उद्या मार्ग निघणारच असतो. थोडा काळ वाईट वाटेल, निराश वाटेल पण, मग आपणच आपल्याला सावरायचं आणि उद्याला हसत सामोरं जायचं. हे अजिबात सोपं नाही, पण अशक्य नाही. जमतं. त्यासाठी, आयुष्यावर प्रेम हवं, स्वतःवर प्रेम हवं आणि जगण्यावर प्रेम हवं.
शाळेत एक संस्कृत सुभाषित होतं, त्यातला एक श्लोक मला आजही जगण्याची उर्जा देतो- आशानाम मनुष्याणाम् काचिदाश्चर्यशृंखला ख यया बद्धा प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठंती पंगुवत् – म्हणजे, आशा नावाची बेडी जोवर मनुष्याच्या पायात आहे, तोवर तो धावत असतो. ज्या दिवशी ही बेडी नाहीशी होते, तेव्हा तो पांगळा होतो.
आपल्याला जर उद्याची आस, ओढ असेल, भविष्याबाबत आशा असेल तर आपण आपल्या वर्तमानात न थकता धावू शकतो. ती उर्जा मिळण्यासाठी जगण्यावर, स्वतःवर प्रेम हवच. जे चांगलं आहे ते पाहण्याचा चष्मा लावायला हवा. दुःख, अपमान, कटुता या गोष्टी काही काळाने विसरून जाण्याची किंवा ज्यांनी ते दिलं त्यांना माफ करण्याची सवय हळूहळू अंगी आणायला हवी. गंमत म्हणजे यातील कोणतीच गोष्ट, कोणतीच उर्जा, सवय ही विकत मिळत नाही, म्हणजे रेडीमेड मिळत नाही. ती आपली आपल्यालाच अंगी बाणवायला लागते. त्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच म्हंटलं, की ते सोपं नक्कीच नाही… पण, अशक्यही नाही!
मी लहान असताना पासून कधीही एखादी गोष्ट जमली नाही तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहायचे. मग, मोठी झाल्यावर प्रेम, लग्न, नोकरी या फ्रंटस् वर अनेकदा अनेक नकार, अपयश पचवलं. तरीही, जमेल मला, होईल यातूनही चांगलं काहीतरी असं म्हणून न थांबता पुढे चालत राहिले. आई म्हणायची, तू म्हणजे शिशाची बाहुली आहेस. कितीही थपडा मारल्या, तरी पुन्हा दुप्पट जोमाने उभी राहतेस. आठवली का शिशाची बाहुली? ती नाही का, लहान मुलांना खेळायला हवा भरलेली बाहुली असते जी कितीही थपडा मारल्या तरी परत उभी राहते? तीच! कुठून आली इतकी उर्जा की काहीही झालं, तरी यातूनही काहीतरी चांगलं होणार असेल, हा विश्वास निर्माण झाला माझ्यात? मला माहीत नाही… पण, मला छान जगायचं आहे, आणि म्हणूनच ते जगणं छान व्हावं म्हणून इतरांच्यातील फक्त चांगल्या गोष्टी पाहाव्या, त्यातील जे चांगलं घेण्यासारखं असेल ते घ्यावं, वाईट आठवणीना मनातल्या पाटीवर स्पंज फिरवून पुसण्याची प्रॅक्टिस करावी, न आवडणाऱ्या, नकारात्मक बोलणाऱ्या वागणाऱ्या माणसांपासून दूर राहावं… हे मी हळूहळू करत गेले. परिणाम अर्थातच मला आणि माझ्या आजूबाजूच्यांना दिसले, दिसतात.
हां, पण आपण चांगलं वागलो तर जग आपल्याशी चांगलं वागेल, यावर विश्वास ठेवला, तरी कधीकधी या विश्वासाला तडा जाईल असं वागतात लोक. खूप उदास, निराश वाटतं अशावेळी. मग, काय करायचं? थांबायचं. काही क्षण, काही तास, काही दिवस… आपण माणूस आहोत. आपल्याला संवेदनशील मन आहे ज्याला जखमा झाल्या, तर दुखतं. रडू येतं. तर रडून दुःख हलकं होऊ द्यायचं. दुःख हे ही नेहमी कायमस्वरूपी नसतं. त्याची तीव्रताही हळूहळू कमी होते. काळ हेच त्यावरील औषध असतं.
म्हणूनच मनाच्या जखमा सतत कुरवाळत बसायचं नाही, पण त्या भरण्यासाठी योग्य वेळ द्यायचा. पण, हे सगळं होत असतानाही स्वतःवरचा विश्वास ढळू द्यायचा नाही. उमेद हरायची नाही. हे इतकं सोपं नाही, पण वाटतं तितकं अवघडही नाही… जिथे पाण्याच्या प्रवाहात मध्ये मोठा दगड आला, तर पाणी त्याला वळसा घालून जातं, तसच त्या अप्रिय गोष्टीला, दुःखाला वळसा घालून पुढे जात राहायचं. आपण नदीच्या प्रवाहासारखं असलं पाहिजे, पुढे जात राहणारं… असं आजी म्हणायची. ते पक्कं मनात कोरलं गेलं आहे.
आयुष्याचे जमाखर्च मांडता मांडता, जमेच्या बाजूकडेही बघत राहायचं. ती बाजूच आपल्याला जगण्याची उमेद देत असते. आणि ती बाजू पूर्ण रिकामी ठेवून सृष्टीनिर्माता आपल्याला कधीच जन्माला घालत नाही. स्वतःवर नसेल, तर किमान त्याच्यावर भक्कम विश्वास ठेवायचा! सकारात्मता आपोआप सावलीसारखी आपली सोबत करते.
आपल्याकडे काय कौशल्य आहे, काय जमेची बाजू आहे, काय चांगलं आहे याचा शोध घेऊन त्यावर लक्ष केन्द्रित करायचं, जगण्यावर मनापासून प्रेम करायचं आणि “आशा’ नावाची बेडी पायात असू द्यायची! सकारात्मक विचार कधीच तुमची पाठ सोडणार नाहीत; उलट ते रोज नव्याने हसत, आनंदाने जगायला उर्जा देतील.
– मृणाल काशीकर- खडक्कर