मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीन देसाईचे निधन अत्यंत वेदनादायी आहे. नितीन हा “प्रभात’च्या काळानंतर स्वतःचा स्टुडिओ असणारा मराठीतील एकमेव निर्माता होता. “बालगंधर्व’ हा चित्रपट नितीन देसाई नसता तर होऊच शकला नसता. प्रेक्षकांसाठी काहीतरी करुन दाखवण्याबाबतचा जो टोकाचा वेडेपणा किंवा जो मॅडनेस बालगंधर्वांमध्ये होता तोच नितीनमध्ये होता. कितीतरी उत्तमोत्तम कलाकृती त्याच्यामुळे पडद्यावर सुंदर दिसल्या. इतकं सुंदर चित्र घडवणारा आमचा मित्र स्वतःच्या आयुष्याचं चित्र असं बेरंग का करून गेला, हा प्रश्न मनाला सतावणार आहे.
ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी ठरली. एखाद्या सकाळी उठल्यानंतर नितीनविषयी असं काही तरी कानी येईल, असं कधीच वाटलं नाही. कारण तो लढवय्या होता. आजवर आलेल्या अनेक संकटांचा हिरीरीने आणि धैर्याने सामना करत त्यांवर मात करत तो त्यातून बाहेर पडला होता. त्यामुळं इतकं टोकाचं पाऊल तो कधी उचलेल असं वाटण्याची सूतराम शक्यता नव्हती.
गेल्या वर्षी त्याच्या स्टुडिओला आग लागली. या आगीत 2008 साली प्रदर्शित झालेल्या “जोधा अकबर’ या चित्रपटाचा सेट जळून खाक झाला होता. नितीनसाठी ही घटना फार गंभीर होती. पण त्यावेळीही तो डगमगला नाही. त्याने पुन्हा स्टुडिओ उभा केला. त्यामुळं छोट्या-मोठ्या संकटांनी डगमगणारा नितीन कधीच नव्हता. उलट त्याच्याकडे पाहून आम्हाला काम कसं करायचं, मोठी स्वप्नं पाहून त्यांच्या मागे लागून ती पूर्णत्वाला कशी न्यायची हे आम्ही नितीनकडे पाहून शिकलो. साहजिकच अशा व्यक्तीनं अनैसर्गिक पद्धतीनं मरण पत्करावं ही बाब मनाला चटका लावून गेली.
नितीन हा “प्रभात’च्या काळानंतर स्वतःचा स्टुडिओ असणारा मराठीतील एकमेव निर्माता होता. कितीतरी उत्तमोत्तम कलाकृती त्याच्यामुळे पडद्यावर सुंदर दिसल्या. इतकं सुंदर चित्र घडवणारा आमचा मित्र स्वतःच्या आयुष्याचं चित्र असं बेरंग का करून गेला, हा प्रश्न मनाला सतावणार आहे.
मुळात नितीनचा स्वभाव हा स्वतःच्या अडीअडचणींविषयी बोलणारा नव्हता. तो नेहमी कलेच्या गोष्टी बोलायचा, नवीन स्वप्नं दाखवायचा. स्वतःच्या आयुष्यातील समस्या त्यानं कधी कुणाला सांगितल्या असतील असं मला वाटत नाही. आमचं नियमित बोलणं व्हायचं. गेल्या महिन्यामध्ये मी त्याच्या एनडी स्टुडिओमध्ये गेलो होतो तेव्हा त्याने मला आणि आमच्या टीमला स्वतः सोबत फिरून सगळा स्टुडिओ दाखवला होता. त्यानंतर मी माझ्या कुटुंबीयांसोबत कर्जतला गेलो होतो तेव्हाही त्यानं आम्हाला अगदी आस्थेनं सर्व स्टुडिओ फिरून दाखवला. अगदी काही दिवसांपूर्वी “बालगंधर्व’च्या पॉडकास्टच्या निमित्तानं आम्ही एकत्र भेटणार होतो; पण बाकीची मंडळी नसल्यामुळं ती भेट रद्द झाली.
नितीनच्या महाराणा प्रताप यांच्यावरील वेबसीरिजमध्येही मी काम करणार होतो. त्यामुळं नितीन हा सदोदित कामात मग्न असणारा होता. अलीकडील काळातील भेटीत त्याच्या चेहऱ्यावर थकवा, तणाव दिसून यायचा; पण वयोमानानुसार किंवा खूप काम केल्यामुळं किंवा पुरेशी झोप न घेतल्यामुळं तो असावा असं वाटायचं. त्यामागे इतकं काही तरी घडत असेल आणि त्यामुळं त्याला इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागेल असं कधीच वाटलं नाही. आर्थिक समस्या असल्या तरी त्याच्या कार्यक्षमतेवर, जिद्दीवर, धडाडीवर आमचा विश्वास होता. हा माणूस कसल्याही संकटावर मात करून बाहेर पडेल याची खात्री वाटायची. त्यामुळंच त्याच्या निधनाच्या बातमीनं मी निःशब्द झालो.
“बालगंधर्व’ हा चित्रपट नितीन देसाई नसता तर होऊच शकला नसता. प्रेक्षकांसाठी काहीतरी करून दाखवण्याबाबतचा जो टोकाचा वेडेपणा किंवा जो मॅडनेस बालगंधर्वांमध्ये होता तोच नितीनमध्ये होता. त्यामुळं “बालगंधर्व’ करण्याचं ठरल्यानंतर अवघ्या 4 महिन्यांमध्ये त्यानं सेट उभा केला. इतक्या वेगानं आणि मेहनतीनं त्यानं काम केलं. त्यातील छोट्या छोट्या गोष्टींची पूर्तता केली. बालगंधर्वांनी जे भव्यदिव्य नाटक करण्याचं स्वप्न पाहिलं, तशाच प्रकारे “बालगंधर्व’ चित्रपट करण्याचं स्वप्न नितीनं पाहिलं. नितीन देसाईशिवाय हा चित्रपट दुसरं कुणीही करु शकलं नसतं. इतका धाडसी निर्णय घेणारा आणि तो तितक्याच क्षमतेनं पूर्णत्वाला नेणारा नितीनच एकमेव होता. त्या काळामध्ये मी नितीनला खूप जवळून पाहिलं. सकाळी 6 वाजता ऑफिसमध्ये येऊन काम सुरू करायचा आणि रात्री उशीर झाला तरी त्याचं काम सुरू असायचं. स्वतःबरोबरीनं तो इतरांनाही यामध्ये सहभागी करुन घ्यायचा. मेहनतीच्या बाबतीत तो आमच्यापेक्षा नेहमीच पुढं असायचा. त्याकाळातील अनुभवातून शिस्तीचं, मेहनतीचं महत्त्व नितीनमुळं नव्यानं मला कळलं. मोठी स्वप्नं पाहण्याचं पॅशन नितीनमुळं अनेकांना मिळाली.
अलीकडेच त्याच्या मुलीचं लग्न झालं. त्यावेळीही तो खुशीत होता. अतिशय थाटामाटात त्यानं हा विवाह समारंभ पार पाडला. आपली मुलगी चांगल्या घरी जात आहे याचा त्याला खूप आनंद होता. तेव्हाही कधी त्यानं त्याच्या मनावरचं दडपण जाणवू दिलं नाही.
प्रचंड मेहनती असल्यामुळं त्याच्याविषयी, त्याच्या कामाविषयी आम्हाला आदर होता. एका छोट्याशा घरातील मुलाने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर, कर्तृत्वावर घेतलेली इतकी मोठी झेप पाहून अभिमान वाटायचा. हा आदर आणि प्रेम आयुष्यभर कायम राहील. पण त्यानं इतकी टोकाची भूमिका का घेतली, हा प्रश्न आयुष्यभर छळत राहील. कलाक्षेत्रातील त्याची जागा कुणीही भरून काढू शकणार नाही.
– सुबोध भावे, सुप्रसिद्ध अभिनेते