जागतिक क्रिकेटची एकेकाळची महासत्ता असलेल्या वेस्ट इंडिजचे हे मांडलिकत्व पाहावत नाही. त्यांच्या क्रिकेटची ही अवस्था का झाली, असा प्रश्न निर्माण होतो व मन एकदम इतिहासात त्यांच्याकडून झालेल्या चुकांवर केंद्रित होते. कित्येक वर्षे अधिराज्य गाजवणारा हा संघ आज एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेला पात्र ठरू नये ही शोकांतिकाच आहे. या गोष्टीसाठी जबाबदार आहेत अशा काही कारणांचा हा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न.
इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व मोडून काढताना वेस्ट इंडिजने एकहाती सत्ता स्थापन केली होती. एकेक रथी-महारथी खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेटचा स्तर इतका उंचावला की त्यापुढे जागतिक क्रिकेटमधील अनेक संघांनी शरणागती पत्करली. मात्र, त्यांची ही एकहाती सत्ता 1990 सालच्या दशकात कमी होऊ लागली व ऑस्ट्रेलिया जागतिक क्रिकेटची सुपरपॉवर बनली. अर्थात, त्याही स्थितीत वेस्ट इंडिज संघाला इतकी घरघर लागलेली दिसली नाही. मात्र, ती धोक्याची घंटा होती हे आज लक्षात येत आहे. त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, नैसर्गिक खेळ आहे मात्र, त्यांना एकसंधपणे बांधून ठेवत आपल्याला हवी तशी कामगिरी करून घेणारा क्लाइव्ह लॉइडसारखा कर्णधार नाही. 1970 ते 1990 या दोन दशकांत वेस्ट इंडिज संघ संपला व आज त्यांची कामगिरी इतकी रसातळाला गेली की त्यांना ज्या विश्वकरंडक स्पर्धेचे दोनवेळा तेदेखील सलग विजेतेपद मिळवले होते, त्यासाठी यंदा पात्रही होता आले नाही.
बेदरकार फलंदाजी बनली बेलगाम
वेस्ट इंडिजच्या संघाबद्दल एक दिसून आले की, त्यांच्याकडे सर विव्ह रिचर्डससारखे बेदरकार फलंदाज आजही आहेत. मात्र, ते बेलगाम बनल्यामुळेच त्यांचे नुकसान झाले. समोरचा गोलंदाज कोणीही असो, कोणतेही मैदान असो किंवा कोणताही संघ असो प्रत्येकवेळी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी समोरच्याला कस्पटासमान बाजूला काढले. आमच्या पिढीने जॉर्ज हेडलीला नाही पाहिले पण ब्रायन लाराला पाहिले आहे. लाराही ज्याच्यासमोर फिका ठरेल असे लॉइडच एकदा म्हणाला होता तो हेडली कसा असेल; परंतु लारानंतर संपूर्ण जगावर राज्य करेल असा फलंदाज त्यांना गवसलाच नाही. लॉइड परवडला इतका गॅरी सोबर्स भयंकर होता. अष्टपैलू हे बिरूदही मला वाटते त्याच्यामुळेच क्रिकेटला मिळाले असावे. लॉइड, सोबर्स, रोहन कन्हाय, गॉर्डन ग्रिनीज, डेसमंड हेन्स, रिची रिचर्डसन, विव्ह रिचर्डस, ब्रायन लारा असे एकापेक्षा एक दिग्गज फलंदाज त्यांनी जागतिक क्रिकेटला दिले. आताही त्यांच्याकडे ख्रिस गेल होता, कॅरन पोलार्ड होता किंवा आता शेमरन हेटमायर आणि निकोलस पूरन आहेत; पण त्यांच्याकडे तो दर्जा नाही आणि ती मानसिकताही नाही.
तोफखान्याचा दारूगोळाही आटला
एकदा एका सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजचा कर्णधार असलेल्या लॉइडला एका पत्रकाराने विचारले की, तुमचा संघ 10 धावांवर बाद झाला तर काय कराल. त्यावर “आम्ही समोरच्या संघाला 9 धावांच्या आत बाद करू व विजय मिळवू’, असे उत्तर लॉइडने दिले होते. खरोखरच धडकी भरणे कशाला म्हणतात हे त्यांच्या गोलंदाजीच्या तोफखान्याकडे पाहिल्यावर कळायचे. मायकल होल्डींग, अँडी रॉबर्टस, माल्कम मार्शल व गॉर्डन ग्रिनीज हे चारच गोलंदाज प्रतिस्पर्धा संघाला पुरत काय पुरून उरत होते. त्यांच्याविरुद्ध आपला सुनील गावसकर हा एकमेव फलंदाज यशस्वी ठरला बाकीच्यांना त्यांनी दाती तृण धरून शरण आणले.
हे महान गोलंदाज निवृत्त झाल्यावरही त्यांच्याकडे पॅट्रीक पॅटरसन, कोर्टनी वॉल्श, कर्टली ऍम्ब्रोससारखे महान गोलंदाज झाले पण जर हेच गोलंदाज दोन दोन दशके खेळत राहिले तर अन्य गोलंदाजांना संधी मिळणार कशी. हेच त्यांच्या आजच्या स्थितीचे सर्वात मोठे कारण आहे. केमार रोश चांगला गोलंदाज आहे पण त्याच्याकडे पाहिल्यावर हा वेस्ट इंडिजचा तोफखाना सांभाळू शकतो, असे वाटतच नाही. त्यांचे नवोदित गोलंदाजही फारसे तुल्यबळ नाहीत. पोर्ट ऑफ स्पेन त्रिनिदादच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनाही आश्चर्याचा धक्का देणारा लॅरी गोम्ससारखा फिरकी गोलंदाज आज त्यांच्याकडे नाही. त्यांची गोलंदाजीतील ताकद संपली व तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांच्या क्रिकेटचा ऱ्हास झाला.
देशांतर्गत स्पर्धेची गुणवत्ता काय?
भारत, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्याकडे देशांतर्गत स्पर्धांचा एक आराखडा आहे. त्याची उपयुक्तता इतकी मोठी आहे की आजच्या घडीला त्यांच्या संघातून सरस कामगिरी करणारे फलंदाज याच मुशीतून पुढे आले आहेत. तशी वेस्ट इंडिजकडे कोणतीही रचना नाही. किंबहुना कॅरेबियन टी-20 लीगचा दर्जा भारतातील एखाद्या क्लब दर्जाच्या स्पर्धेइतकाच आहे ही वस्तुस्थिती आहे. भारतात रणजी, विजय हजारे, सय्यद मुश्ताक अली, दुलीप करंडक स्पर्धा आहेतच; पण मर्यादित षटकांच्या स्पर्धेसाठी भक्कम सेकंड बेंच दोणारी आयपीएल स्पर्धा आहे. जर खेळाडूला त्याच्या योग्य वयात योग्य व्यासपीठ लाभले नाही तर त्याचे काय होते, हे आजच्या त्यांच्या संघातील युवा खेळाडूंकडे पाहून कळते. त्यांना जर या अपयशातून वाट काढायची असेल तर आधी त्यांच्या देशांतर्गत स्पर्धेकडे गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे. तिथे गुणवत्ता वाढली तर आपसूकच राष्ट्रीय संघाचीही गुणवत्ता वाढेल. कदाचित त्यांना लॉइड, सोबर्स, रिचर्डस किंवा लारा नाही मिळणार; पण रामनरेश सरवान, शिवनारायण चंदरपॉलसारखे फलंदाज निश्चितच गवसतील, हेही नसे थोडके.
आर्थिक स्थैर्य मिळावे
मस्तमौला जीवनशैलीचा पुरस्कार करणारा हा देश सोमवार ते शुक्रवार काम करतो व शनिवार आणि रविवार कोणत्याही मैदानावरचा सामना पाहात बिअरचा आस्वाद घेत आयुष्य जगतो. त्यांच्याकडे एक देश म्हणून सांगावे असे एकही उत्पादन नाही. त्यातच बेरोजगारी व महागाईमुळे नागरिकही धास्तावले आहेत. अशा स्थितीत क्रिकेटकडे वळणारे असे किती युवक असतील. क्रिकेटमध्ये पाच ते सात वर्षे घालवण्यापेक्षा इंग्लंड किंवा अमेरिकेत राष्ट्रीय बास्केटबॉल (एनबीए) खेळणे व त्यातून रग्गड कमाई करणे हे आता त्यांचे मुख्य उद्दिष्ट राहिल्याचे दिसते. एकतर वेस्ट इंडियन लोकांची सरासरी उंची सहा फुटांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अशा ताडमाड उंचीचा लाभ त्यांना बास्केटबॉल खेळताना होतो व त्यातून होत असलेल्या कमाईमुळे त्यांना आर्थिक स्थैर्यही मिळते मग ते क्रिकेट का खेळतील.
मुळातच वेस्ट इंडिजचे क्रिकेट मंडळ गरीब आहे. त्यांच्याकडे जेव्हा भारतीय संघ खेळायला जातो तेव्हाच त्यांना कमाई होते. बाकी त्यांचे खेळाडू मग तो गेल असो वा पोलार्ड परदेशात होत असलेल्या विविध टी-20 लीग क्रिकेटमध्ये खेळतात व बक्कळ पैसा कमावतात. मात्र, एका देशाचे क्रिकेट मंडळ म्हणून ते संपूर्ण संघाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल इतक्या रकमेचाही करार देऊ शकत नाहीत. जेव्हा त्यांचे खेळाडू जागतिक स्टार म्हणून गणले जात होते तेव्हा देखील आजच्या भारतीय खेळाडूंना जितका पैसा लॉंड्री चार्ज म्हणून मिळतो तेवढे सामन्याचे मानधनही मिळत नव्हते. आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने सुरू केली तेव्हा वेस्ट इंडिजच्याच खेळाडूंना सर्वाधिक मागणी होती पण त्यांच्या संघाकडून खेळत देशाचे प्रतिनिधित्व करावे असे त्यांच्यापैकी कोणालाही वाटले नाही.
मंडळ राजकारणमुक्त व्हावे
वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरपासून आताच्या खेळाडूंपर्यंत अनेक खेळाडूंनी त्यांच्याच देशाच्या क्रिकेट मंडळाला कडाडून विरोध करत अनेक मालिकांमधून माघार घेतली होती. याचे मुख्य कारण होते ते म्हणजे पैसा. जर तोच मिळत नसेल तर कशासाठी खेळायचे. त्यांना घर चालवण्यासाठी क्रिकेट खेळावे लागते आपल्यासारखे नाही. आपल्याकडे काही खेळाडू मद्य, पान मसाला अशा जाहिराती करूनही घर चालवू शकतात. त्यांच्या क्रिकेट मंडळात जी माणसे होती त्यांनी त्यावेळी आयसीसीकडून मिळत असलेल्या पैशांचा विनियोग देशाचे क्रिकेट घडवण्यासाठी केला असता तर आज संघाची ही दयनीय अवस्था झाली नसती. केवळ स्वार्थ साधण्यासाठीच त्यांच्याकडे क्रिकेट मंडळावर येण्याची चढाओढ दिसून येते. लारा कर्णधार होता तेव्हाही संघातील अन्य खेळाडू त्याला सहकार्य करत नव्हते. जी स्थिती लाराची होती, तीच वॉल्श, गेल यांचीही होती. आपल्याकडे क्रिकेटमध्ये जसा प्रांतवाद चालतो तसा तिथेही चालतो. तिथेच काय ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या देशांतही चलतो. किंबहुना इंग्लंडने ज्या ज्या देशांवर राज्य केले त्यांची हीच अवस्था आहे. भारतातही परिस्थिती काही वेगळी नाही.
राष्ट्रीय अकादमी असावी
वेस्ट इंडिजला या अपयशाच्या गर्तेतून बाहेर यायचे असेल तर नव्या पिढीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. क्रिकेटचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळेल अशी व्यवस्था उभारावी लागेल. भारतासह अनेक देशांत जशा राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आहेत तशाच वेस्ट इंडिजमध्येही सुरू व्हाव्यात. इंग्लंड, भारत व ऑस्ट्रेलिया या देशांनी त्यांच्या देशाचे दौरेही सातत्याने केले पाहिजेत. यातूनच त्यांना पैसाही मिळेल व त्यांच्या नवोदितांना बलाढ्य संघांशी सातत्याने खेळल्याने अनुभवही मिळेल व जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवलेला हा संघ फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पुन्हा एकदा भरारी घेईल. त्यांना ही भरारी घ्यावीच लागेल अन्यथा क्रिकेटमधून निरागसता व नैसर्गिकताच निघून जाईल.
अमित डोंगरे