सातारा – कॉंग्रेस आणि इतर पक्षांनी जनतेला विकासापासून, प्रगतीपासून वंचित ठेवले आहे. 70 टक्के लोक आपल्या बाजूने आहेत. त्यामुळे आपण महाविजय मिळवणारच. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप प्रणित सरकार आज सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या विकासाच्या योजना आपण तळागाळात पोहचवल्या पाहिजेत, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
सातारा लोकसभा मतदारसंघातील टिफिन बैठकीत बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, सुरभी भोसले, सुनील काटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. उदयनराजे म्हणाले, “”पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा पहिला आमदार मी होतो. देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आदींना मी तलवार आणि वाघनख्या भेट दिली आहे. कारण शिवाजी महाराजांनी गमिनी काव्यानेच स्वराज्य उभे केले आहे आणि या पद्धतीने आपले सरकार उभे राहिले पाहिजे. यासाठीच मी त्यांना भेटलो आहे.
मी तुमच्या मधीलच एक आहे, माझी पूर्वपुण्याई म्हणून मी या घरात जन्माला आलो आहे. मीही एक माणूसच आहे आणि माणसाकडूनच चुका होतात, मी काय देव नाही. त्यामुळे आपण सर्वजण एकमेकांना समजूनच घेत पुढे गेलो पाहिजे.” आपण आगामी निवडणुका एक संघपणे लढवून लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आणले पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या विकास योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यत पोहचायला हव्यात, असे आवाहन उदयनराजे यांनी केले. आमदार जयकुमार गोरे म्हणाले, “”खासदार उदयनराजे भोसले जिल्ह्याच्या नाही तर राज्याच्या पातळीवर कार्यरत दिसले पाहिजेत.
ते मला आज दिसत आहेत. त्यामुळे मी आज खूप आनंदी आहे. या राज्यात फक्त छत्रपतींचा आदेश चालतो. त्याच छत्रपतींच्या वारसदारांनी आजच्या टिफिन बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीस महत्त्व आहे.” या कार्यक्रमात सुरभी भोसले, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, विक्रम पावस्कर आदींनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.