सुदीरामन करंडक बॅडमिंटन स्पर्धा पुढील महिन्यात चीनमध्ये होत आहे. खरेतर या स्पर्धेद्वारे पुढील वर्षी पॅरिसमध्ये होत असलेल्या स्पर्धेसाठीचा सराव होणे महत्त्वाचे आहे, कारण ही स्पर्धा म्हणजेच जागतिक बॅडमिंटनचे वर्चस्व मोडून काढण्याची व पॅरिसमधील पदकाची आशा वाढवण्याची रंगीत तालीम ठरणार आहे.
या स्पर्धेसाठी भारताचा बॅडमिंटन संघ नुकताच जाहीर करण्यात आला मात्र, त्यातील किती खेळाडू चीनमध्ये या स्पर्धेसाठी रवाना होतील याबाबत शंकाच आहे. करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता ही स्पर्धा मुळात चीनमध्ये घेतलीच का जात आहे, हाच मोठा प्रश्न आहे. त्यातच आपल्या खेळाडूंनी दुखापती, करोनाचा धोका किंवा वैयक्तिक कारणांनी स्पर्धेतून माघार घेतली, तर ही रंगीत तालीम निरस ठरणार आहे. मात्र, ज्यांना संघात निवडले आहे किंवा राखीव म्हणून घेतले आहे त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली तर बरोबर एक वर्षाने पॅरिसमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपली तयारी कशी होत आहे, हे लक्षात येणार आहे. त्यात काय बदल व सुधारणा करावी लागेल ते देखील समोर येणार आहे.
प्रणोयच्या कामगिरीवर भिस्त
भारताचा स्टार खेळाडू एच. ए. प्रणोय याच्या कामगिरीवरच या स्पर्धेत भारताची मदार राहणार आहे. खरेतर पुरुष गटात त्याने यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे. त्यातही प्रणोयने इंडोनेशिया, चीन, कोरिया व जपान यांच्या मानांकित खेळाडूंवर वर्चस्व राखले आहे. भारताचा ऑल इंग्लंड विजेता खेळाडू व सध्याचा प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याच अकादमीत प्रणोय त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सराव करतो. 2010 साली समर ज्युनिअर ऑलिम्पिक स्पर्धेत रजतपदक मिळवल्यानंतर तो खरेतर प्रकाशझोतात आला. तेव्हापासून तो सातत्याने यशाचे एकेक टप्पे पार करत आहे. गेल्या वर्षी त्याने थॉमस करंडक स्पर्धेत कमालीचे सातत्य दाखवले व त्यामुळेच आता सुदीरामन स्पर्धेतही त्याच्याकडून अशाच यशाची अपेक्षा आहे. आता त्याचे जागतिक क्रमवारीत नववे स्थान असून आतापर्यंत त्याने 238 सामने जिंकले असून 160 सामने गमावले आहेत. तो या स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष राहणार आहे.
श्रीकांतही चमत्कार घडवेल
किदाम्बी श्रीकांत हा अनुभवी खेळाडू देखील उच्चकोटीची गुणवत्ता असलेला खेळाडू आहे. त्याने आजवर चीन आणि या खेळात मक्तेदारी असलेल्या देशांच्या अनेक नामवंत खेळाडूंविरुद्ध सरस खेळ केला आहे. त्यामुळे या स्पर्धेत त्याच्याकडूनही अशाच कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. प्रणोयप्रमाणे श्रीकांतही गोपीचंद अकादमीचेच फाइंड असल्याने त्याचे या खेळातील धडे पक्के आहेत. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने 291 सामने जिंकताना 158 सामने गमावले आहेत. त्याची आकडेवारीच त्याच्यातील चमक दाखवते यात शंका नाही.
तो आता प्रणोयप्रमाणेच 30 वर्षांचा असला तरीही कधीकाळी तो जागतिक क्रमावारीत अव्वलस्थानी होता हे विशेष. मात्र, त्यानंतर त्याची कामगिरी खालावली व त्याची क्रमवारीत घसरणही झाली. 2011 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत ब्रॉंझपदकासह कारकीर्द सुरू केलेल्या श्रीकांतने खूप कमी वेळातच जाणकारांना आपली दखल घ्यायला लावली. गेल्या वर्षी जागतिक स्तरावरच अव्वल खेळाडू जोनाथन ख्रिस्तीचा पराभव करत त्याने भारताला थॉमस करंडक स्पर्धेत 3-0 असा विजय मिळवून देताना करंडकावर नावही कोरून दिले. आता त्याची खरी कसोटी सुदीरामन करंडक स्पर्धा असेल कारण याच स्पर्धेतून त्याला ऑलिम्पिकची तयारी करायची आहे. त्याच्यासाठीच्या पात्रता स्पर्धा ज्या काही होतील त्यापूर्वीच या स्पर्धेत एकेरीत पदक मिळवले तर त्याला पात्रता स्पर्धांमध्ये जास्त घाम गाळावा लागणार नाही.
लक्ष्य सेन राखीव कशासाठी?
भारताचा सर्वात आश्वासक खेळाडू म्हणून ज्याचे नाव घेतले जाते त्या लक्ष्य सेन यालाच या स्पर्धेत पुरूष एकेरीच्या गटात राखीव खेळाडू म्हणून कसे काय ठेवले गेले याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. म्हणजे जो पदक जिंकून देऊ शकतो तोच जर राखीव असेल तर जे खेळणार आहेत, ते काय स्पर्धेपूर्वीच पदक निश्चित करणार आहेत, असा निवडकर्त्यांना विश्वास आहे की काय. 2018 साली आशियाई ज्युनिअर स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकून दिले व देशभरात त्याचे नाव पोहोचले. आता अवघ्या 21 वर्षांचा असलेला लक्ष्य सेन ऑल इंग्लंडमध्ये कमालीचा यश मिळवत होता, विजेतेपदाने जरी हुलकावणी दिली असली तरीही त्याच्यापुढे अद्याप मोठी कारकीर्द असल्याने सुदीरामन स्पर्धेतही तोच प्रमुख खेळाडू म्हणून निवडला गेला असता तर जास्त विश्वास वाटला असता.
जागतिक क्रमवारीत तो गेल्या वर्षी आठव्या क्रमांकावर होता मात्र, मधल्या काही स्पर्धांतील अपयश व दुखापती तसेच वैयक्तिक कारणांनी विविध स्पर्धांमधून घेतलेल्या माघारीमुळे त्याचे सध्याचे मानांकन 25 पर्यंत खाली आहे. त्यामुळेच कदाचित त्याला राखीव खेळाडू म्हणून संघात निवडले गेले असावे. यो योंग सुन या कोरियाच्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असल्याचाही त्याला हा फटका बसला असेल. कारण तो गोपीचंद अकादमीचा नाही त्यामुळे तो प्रमुख दोन खेळाडूंमध्ये नाही असेच दिसत आहे. राजकारण काय केवळ क्रिकेटमध्येच असते असे नाही अन्य खेळांतही ते दिसतेच दिसते. गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते हे कारणही त्याला मुख्य खेळाडू म्हणून संघात घेऊ शकले नाही याला काय म्हणावे.
सिंधूशिवाय कोणीच नाही का?
पुरुष संघाचा ताळमेळ पाहिला तर आता महिलांच्या संघाबाबतही बोलणे क्रमप्राप्तच आहे. इतकी वर्षे झाली पण आपल्याला अद्याप पी. व्ही. सिंधू व्यतिरिक्त अन्य नाव पटकन समोर येत नाही. जसे भारतीय महिला टेनिस म्हटले की केवळ सानिया मिर्झाच समोर येते तसेच आता बॅडमिंटनचे नाव घेतले तर सिंधू व्यतिरिक्त अन्य कोणत्याही महिला खेळाडूचे नाव समोर येत नाही. गेल्या दोन ते तीन मोसमांचा विचार केला तर टोकियो ऑलिम्पिकचा अपवाद वगळता सिंधूच्या हाती एकाही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद लागलेले नाही. काही स्पर्धांमधून तर तिने स्वतःहूनच माघार घेतली होती, तर काही स्पर्धा या पहिल्याच फेरीत तिच्यासाठी संपल्या होत्या.
आता या स्पर्धेत ती कशी कामगिरी करते यावरच लक्ष राहील. कारण सायनाची स्पर्धेसाठी निवडच झालेली नाही. अर्थात निवड झाली असती तरीही तिने कशी कामगिरी केली असती याबाबत न बोललेलेच बरे. ती पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत पराभूत होते हे आता कोष्टकच तयार झाले आहे. तिच्यातील तो पूर्वीचा स्पार्क किंवा टच हरवला आहे. त्यातच दुखापतींचा ससेमीराही आहेच; परंतु तिच्याकडे अद्याप किमान दोन वर्षांची कारकीर्द होती तरीही तिने स्वतः काय किंवा निवड समितीने काय कारकिर्दीकडे लक्षच दिलेले नाही हे उघड आहे. त्यातच आधी गोपीचंद मग विमल कुमार असे सातत्याने प्रशिक्षक बदलत राहिल्याने व काहीसा इगो बाळगल्याने एका यशस्वी कारकिर्दीची अशी सांगता व्हावी यासारखी शोकांतिका नाही.
तिने निवृत्ती घेतली नसली तरीही ती पुनरागमनही करत नाही म्हणजे मग नवोदितांचा शोध घेण्याशिवाय अन्य पर्यायच राहात नाही हे देखील सत्य आहे. त्यामुळे मग या स्पर्धेसाठी अनुपमा उपाध्यायला निवडले गेले आहे. गेल्या कित्येक स्पर्धांमध्ये तिने आश्वासक कामगिरी केली आहे यात शंका नाही. मात्र, अद्याप तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर अजून स्वतःला सिद्ध करायचे आहे व ही स्पर्धा तिच्यासाठी अत्यंत मोठे व्यासपीठ ठरणार आहे. आकर्षी कश्यपला राखीव म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. म्हणजेच करोना किंवा प्रमुख खेळाडूंना दुखापती वा अन्य कारणांनी सहभागी होता आले नाही, तर त्यांच्या जागी आकर्षीला संधी मिळेल. तिने 2018 सालच्या आशियाई स्पर्धेद्वारे पदार्पण केले. तसेच तिची देशांतर्गत स्पर्धांतील कामगिरी पाहून 2019 सालच्या दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. याच संघाने सुवर्णपदक पटकावले होते. मात्र, आता ती सुदीरामन स्पर्धेत महिलांच्या एकेरीत कशी कामगिरी करते यावरच ती पॅरिससाठी इंडिया मटेरियल आहे का, ते स्पष्ट होणार आहे.
महिला दुहेरी व पुरुष दुहेरीतही आशा
महिलांच्या दुहेरीत गायत्री गोपीचंद व ट्रीसा जॉली यांच्यासह अश्विनी पोनाप्पा व तनिषा क्रॅस्टो ही जोडीदेखील आहे. मात्र, गेल्या मोसमापासून गायत्री व ट्रीसा या चांगल्याच भरात आहेत. त्यांनी ऑल इंग्लंड स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली होती, त्यामुळे या गटात त्यांच्याकडूनही यशाची अपेक्षा केली तर ती चूक ठरू नये. पुरुष गटाबाबत बोलायचे तर सात्विक साईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी यांच्यासह एमआर अर्जुन व ध्रुव कपिला या दोन जोड्या या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सर्वात जास्त लक्ष राहणार ते रांकीरेड्डी व शेट्टी याच जोडीकडे कारण त्यांनीही राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने यश मिळवले आहे. खरे तर एकेरीपेक्षा या स्पर्धेत आपल्याला दुहेरीतच जास्त उज्ज्वल यशाची खात्री देता येईल. असो ही स्पर्धा पुढील महिन्यात चीनमध्ये होत आहे व त्यात आपल्याला पॅरिसची तयारी करायची हेच लक्ष्य ठेवावे लागणार आहे. जो पदक जिंकेल तोच पुढील वर्षी पॅरिसचा स्टार ठरेल व त्यासाठी ही रंगीत तालीम सर्वात जास्त महत्त्वाची ठरणार आहे.
अमित डोंगरे