हिंजवडी – आयटी हब म्हणून जगभरात नावाजलेल्या हिंजवडी-मारुंजी परिसराला कचऱ्याचे हब म्हणण्याची वेळ आली आहे. ज्या वेगाने हिंजवडी परिसराची लोकसंख्या वाढत आहे. त्या तुलनेत पायाभूत सुविधा पुरविण्यात येथील ग्रामपंचायती सपशेल अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे हिंजवडी, मारुंजी आदी ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याची सर्वांत मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा रस्त्याने चालणे मुश्किल होऊ शकते.
राज्य सरकारने या वाढत्या नागरीकरणाचा विचार करून या भागासाठी स्वतंत्र यंत्रणा (स्वराज्य संस्था) वेळेतच निर्माण करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. अन्यथा या भागात आलेले देशी विदेशी उद्योग धंदे स्थलांतरित होण्यास वेळ लागणार नाही.
पायाभूत सुविधांअभावी येथील उद्योग स्थलांतरित होण्याच्या मार्गावर असल्याचे सूतोवाच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मागील अधिवेशनात काढले होते. परंतु हिंजवडी परिसरातील सुख सुविधांचा विचार करता या भागात कचरा, पाणी, सांडपाणी, आरोग्य, रस्ते, वीज आशा पायाभूत सुविधांची कमतरतेमुळे आयटीयन्स देखील हैराण झाले आहेत. या भागात एकीकडे ग्रामपंचायत दुसरीकडे एमआयडीसी तर तिसरीकडे पीएमआरडीए आशा अनेक शासकीय संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे अनेकदा हद्दीचा वाद निर्माण होऊन या समस्या सोडवायच्या कुणी हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे कचरा, पाणी, सांडपाण्यासारख्या मूलभूत समस्या आणखी गंभीर होत चालल्या आहेत.
हिंजवडी हद्दीत एमआयडीसीच्या हद्दीतील कंपन्या काही टाऊनशिप व पीएमआरडीएकडून मंजूर झालेल्या मोठमोठ्या सोसायटींमधला कचरा रहिवाशांकडून रस्त्यावर आणून टाकला जातो. तर ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्याकडेला थाटलेल्या दुकानदारांकडून खाद्यपदार्थ व ओलासुका कचरा पिशव्यांमध्ये भरून रस्त्याकडेला टाकला जातो. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने आयटीतील रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीगच्या ढीग पाहायला मिळतात. या मार्गावरून प्रवास करताना नागरिक व वाहनचालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कुणी व कसा काढायचा हा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. याबाबत हिंजवडीचे ग्रामविकास अधिकारी बी. आर. पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
घनकचरा व्यवस्थापन महत्त्वाचे
ग्रामपंचायतीकडून वारंवार उपाययोजना करूनही कचरा समस्या सुटत नसल्याने आता घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यन्वित होणे काळाची गरज आहे. अन्यथा आगामी पावसाळ्यात ही कचरा समस्या रोगराईला आमंत्रण देणारी ठरणार आहे. मारुंजी, हिंजवडी ग्रामपंचायतीने रस्त्यावर कचरा आणून टाकणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई सुरू केली होती. कालांतराने खंड पडल्याने पुन्हा परिस्थिती जैसे-थे च असल्याचे पाहायला मिळत आहे.
दंडात्मक कारवाईकडे दुर्लक्ष
या भागात मोठमोठ्या सोसायट्या झाल्या परंतु कुणाचाही कचरा प्रकल्प कार्यन्वित नसल्याने लोक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रात्री अपरात्री दुचाकी चारचाकी मधून कचरा रस्त्याच्या कडेला आणून टाकतात. तर डेव्हलपर्स लोक रस्त्याच्या कडेला राडारोडा फेकून देतात. त्यामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याचे चित्र आहे. समजून सांगून अथवा दंडात्मक कारवाई करूनही परिस्थिती जैसे थे राहत असल्याने कचरा समस्या हिंजवडीकरांसाठी डोकेदुखी बनली आहे.