स्वयंपाकघरातील मोठ्या भांड्यांना “गंज’ म्हणतात. आपल्याकडे रंग एक चालतो. सूर एक चालतो; मात्र संसारात गंज आणि त्यावरील नावं वेगळीच असावी लागतात. म्हटलं तर हसण्यावारी नेणारी गोष्ट. खोलात शिरलं तर मात्र अशा स्वभावाच्या माणसांची कीव करावी की त्यांच्याकडे लक्ष न द्यावं. आज समाजात घरोघरी असे गंज वेगळे, नाव वेगळे, अधिकार वेगळे मानणारी मंडळी भरपूर जण आहेत. मी माझ्या मुुलीला सुनेला सर्व काही दिलं असं सांगणारी स्त्री सुद्धा “गंज माझा वेगळा’ अशाच समाजाची एक सदस्य असते. “मी नाही बाई त्यातली’ असं भासवून देणाऱ्या, पण मी दिलं, मी दिलं असं सतत म्हणणाऱ्या तिचा रंग वेगळा असला तरी पंथ तोच असतो… गंज माझा वेगळा!
दिवाळी काही पूजाअर्चा, सोवळे-ओवेळं एवढ्यापुरताच सण नाही. तर खा, प्या, मजा करा असा हा सण आहे. त्यामुळे दिवाळीच्या साफसफाईसोबत आतापर्यंत निघालेली जास्तीची भांडी साफसूफ होऊन आपापल्या जागी ठेवली जातात. अशाच एका साफसफाईच्या कार्यक्रमात माझा लहान मुलगा भांड्यावरील नावं अडखळत वाचत होता. आम्ही सारेच त्याची मराठी नावांशी चाललेली लढाई बघत होतो. प्रत्येक भांड्यावर कधी वडिलांच नावं, कधी आजीचं नावं, कुठे आजोबाच नावं! अगदी सर्वात शेवटी एका कुठल्याशा फुलपात्रावर पुसटस् माझं नाव त्याला वाचता आलं! आई गं, फक्त एकच पेला तुझ्या नावाचा? त्याच्या एकाच प्रश्नानं मला काय नाही आठवलं!
आजही भांड्याची आवराआवरी करताना त्याचा तो बालसुलभ प्रश्नांकित चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आजही मी शोधतेय! अजूनही मिळालेलं नाहीय! खरंच आहे काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला आयुष्यभर शोधली तरी मिळत नाहीत. शेवटी ते प्रश्न अनुत्तरित राहतात. त्यांना सोडूनच द्यावं लागत.
परवा व्हॉटसऍपवर एक मेसेज होता. “घर ज्याच्या नावांवर असेल त्यानंच दिवाळी साफसफाई करावी’. खूप हसू आलं! विविध प्रतिक्रिया त्या मेसेजवर होत्या. काही इमोजी होते. या नावासाठी आपली आयुष्यभर धडपड चालू असते. “नावात काय आहे?’ असं भलेही शेक्सपीअर म्हणाला असला तरी नावातच सर्व काही आहे, असं माझं मत आहे.
नाव आहे तर ओळख आहे. नावावर काय काय आहे. तर समाजात प्रतिष्ठा आहे. वय होत आलं आपलं तर आहे ते मुलांच्या नावावर करा असा एक न मागता सल्ला दिला जातो. तुमच्या नंतर घर कोणाच्या नावावर आहे किंवा करणार आहात, केलं नसेल तर ताबडतोब करा. म्हणजे या सर्वात नावाला किती महत्त्व आहे ते कळतं. विशेषत: स्त्री वर्गात हा प्रश्न अगदी ऐरणीचा ठरतो. मी तर माझं सारं काही मुलीला सुनेला दिलेलं आहे.
पण हे किती खरं आहे? हजारदा प्रत्येकाच्या समोर हेच बोलत राहिलं तर ज्यांना दिलं आहे त्यांना किती कानकोडं होईल! अशा किती तरी मजेदार घटनांनी गोष्टींनी आपलं आयुष्य बनत असतं! काही वेळापुरता बदल आणि कायमस्वरूपी बदल यात जमीन आसमानचा फरक आहे. मात्र, स्वभाव बदलणं खरंच खूप कठीण. आज समाजात असे बदल झाल्याचे दिसतात. असं नाही की बदल होतच नाहीत. त्यासाठी मनाची तयारी हवी. प्रत्येक बदलाचा स्वीकार हवा!
लग्नात भेटवस्तू देतांना त्यावर नाव हवंच असतं. कोणाकडून काय आलंय आणि आपण काय द्यायचं, यावर बऱ्याच चर्चा असतात. पुढे लग्न होतं. काही काळ छान जातो. सून म्हणजे अगदी मुलगी होते. नव्याचे नऊ दिवस! दोन संसाराची (म्हणजे आपला संसार आणि सुनेचा संसार) एकत्र वाटचाल सुरू होते. खरी मजा त्यातच असते! जिथे प्रेम तिथेच अधिकार, मालकी हक्क, या भावना मूळ धरतात! यात लिव्हिंग आणि नॉनलिव्हिंग वस्तू, नाती सारंकाही भरडलं जातं! लग्न होताच मुलगा माझा राहिला नाही आणि आईच हवी होती तर लग्न का केलं माझ्याशी? हा वाद काही काळ चालू राहतो. मात्र, वाढीला लागणं धोकादायक असतं!
हे माझं, हे तुझं याचा शेवट ठरलेला असतो. वाटाघाटी सुरू होतात आणि एकाची दोन घरं बहुतेक ठिकाणी होतात. नाही होत ज्याठिकाणी तिथे एक कोणी पडती बाजू घेत आयुष्य संपेपर्यंत वाट बघत राहतं! माझा डाव कधी येणार? माझं माझ्यासारखं, मनासारखं कधी जगता येणार? खरंच याच आशेवर आपण जगत राहतो. स्वत:च्या बकेट लिस्टमधील यादी वाढवतं राहतो. खरं सांगू का? कोणाच्या जाण्यानं खरंच फरक पडत नाही. एक गेला तरी त्याची उणीव भरून काढायला दुसरी पिढी तयार असते.
एक अत्यंत बोलकं उदाहरण आहे माझ्यासमोर. एक जिवलग मैत्रीण आहे माझी. स्वत:च्या कर्तृत्वानं आज एका फार मोठ्या पदावर कार्यरत आहे. छान चौकोनी कुटुंब. कुटुंबांचा “पाचवा कोन’ही आहे. हा कोपरा, कोना मात्र कधीच तिला वाखाणत नाही. स्थितप्रज्ञ नाही म्हणता येणार. पण अतिशय माणूसघाण स्वभाव. आजतागायत मी त्यांना कधीही हसताना पाहिलेलं नाही. त्यांची सगळी भांडी म्हणजे ताटं, वाटी, पेला सारं काही वेगळं. हिच्या स्वयंपाकात त्यांची काहीच भांडी वापरता येत नाहीत.
चुकूनही कधी आलीच तर… विचारायलाच नको. मला नेहमी खूप आश्चर्य वाटायचं! अगं काय हे! काहीच कसं बोलत नाहीस? त्यावर ती फक्त हसायची. एवढ्या मोठ्या कार्यालयाचा पसारा सांभाळणारी. घरातल्या एकही वस्तूंवर अधिकार सांगू शकत नाही? आज ती साठीच्या पुढे आहे. पाचवा कोन 80 च्या वर आहे. पण वातावरण तेच “गंज माझा वेगळा’! हसावं की रडावं हेच कळत नाही.
सध्या “रंग माझा वेगळा’ ही मालिका सुरू आहे. परवा सहजच मुलीशी गप्पा मारत होते. माझी मुलगी नव्या पिढीची शिलेदार आहे. नेहमी म्हणते मला जो जसा आहे तसाच त्याचा स्वीकार करावा. तो बदलणार नाही. बदलू शकत असेल तर स्वतः बदलावं, नाहीतर आपलं टेन्शन वाढतं. समोरच्याला काहीही फरक पडत नाही. आता आताशा मला तिचं म्हणणं पटू लागलयं! मैत्रिणीची कथा म्हणा, व्यथा म्हणा तिला सांगत असताना ती म्हणाली, अगं आई म्हणजे मावशीला सांग ना “रंग माझा वेगळा’सारखं “गंज माझा वेगळा’ असा प्रकार आहे त्यांच्यातील पाचव्या कोनाचा! खरंय तिचं म्हणणं! इकडे नागपूरकडे उभ्या मोठ्या भांड्याना “गंज’ म्हणायची पद्धत आहे.
शेवटी काय रंग एक चालतो. सूर एक चालतो; मात्र गंज आणि त्यावरील नावं वेगळी पाहिजे. म्हटलं तर हसण्यावारी नेणारी गोष्ट. खोलात शिरलं तर मात्र या स्वभावाच्या माणसांची कीव करावी की त्यांच्याकडे लक्ष न द्यावं. आज समाजात घरोघरी असे गंज वेगळे, नाव वेगळे, अधिकार वेगळे मानणारी मंडळी भरपूर आहेत. मी माझ्या मुुलीला सुनेला सर्व काही दिलं असं सांगणारी स्त्री सुद्धा “गंज माझा वेगळा’ अशाच समाजाची एक सदस्य असते. पण “मी नाही बाई त्यातली’ असं भासवून देणारी, मी दिलं, मी दिलं, अस सतत म्हणणारी… पण रंग वेगळा असला तरी पंथ तोच असतो… गंज माझा वेगळा!
– अरुणा सरनाईक