ऋषी कपूर, नाव घेताच डोळ्यासमोर तरळून जातो तो गोरागोमटा, राजबिंडा नायक. पन्नासहून अधिक वर्ष सिनेसृष्टीत वावर केलेल्या या अभिनेत्याला आपल्यातून निघून जाऊन दोन वर्षं होऊन गेली. लोकात न मिसळणारे पण कामात समरस होणारे, भूमिकेत निरनिराळे प्रयोग करणारे, आपल्या अभिनया इतकेच आपल्या जर्सी, स्वेटर व मफलरने प्रेक्षकांना मोहात पाडणारा गोंडस असे व्यक्तिमत्त्व. अभिनेता ऋषी कपूर यांचा 4 सप्टेंबर रोजी जन्मदिन. त्यांच्या कारकिर्दीवर लेख…
“आज कपूरचा पुत्र असल्यामुळे ऋषी यांना कामासाठी कधीच संघर्ष करावा लागला नाही. “श्री 420′ या सिनेमात काही क्षणांसाठी रजतपटावर येऊन गेल्यावर, किशोरावस्थेतील ‘मेरा नाम जोकर’ या सिनेमाद्वारे जरी ऋषी कपूर यांनी सिनेमात पदार्पण केले असले तरी ते सामान्यांना माहीत झाले ते “बॉबी’मुळे. त्यांचा पहिला सिनेमाच त्यांच्या झोळीत फिल्म फेअर पुरस्कार टाकून गेला. “बॉबी’ सिनेमाने त्यांना तरुणाईच्या गळ्यातील ताईतच बनवून टाकले. हे वेड इतके होते की, एका तरुणीने त्यांना नको त्या ठिकाणी ऑटोग्राफ देण्यास सांगितले. या घटनेचा उल्लेख ऋषी कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रातही केला आहे.
खरं तर ऋषी हे “बॉबी’ सिनेमाची पहिली निवड नव्हते, किंबहुना राज कपूर, राजेश खन्नाला घेऊ इच्छित होते, पण “मेरा नाम जोकर’मुळे डबघाईला आलेल्या राज कपूर यांना राजेश खन्नाचे मानधन परवडणारे नव्हते, म्हणून ऋषींची बॉबीत वर्णी लागली. बॉबीच्या अफाट यशाचे उधळलेले वारू नंतरच्या ‘जहरीला इंसान’, ‘रफू चक्कर’ या सिनेमांनी रोखले, पण नीतू सिंग बरोबरच्या ‘खेल खेल में’ या सिनेमाने त्यांच्या करिअरला पुन्हा गती दिली. ‘खेल खेल में’ मध्ये हाती घेतलेली गिटार पुढे त्यांच्या प्रतिमेचा भाग बनली.
चिंटू या नावाने ओळख असलेल्या ऋषींची, शालेय जीवनातील कामगिरी चमकदार नव्हती, किंबहुना त्यांचा बराच वेळ लफंगेगिरी करण्यातच जात असे. त्यामुळे काहीसा उद्धटपणा अंगी बाणावला ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसानही झाले. याच दरम्यान त्यांचे यास्मिन बरोबरचे पहिले प्रेमभंगही झाले, पण ती पोकळी “अमर अकबर अँथनी’च्या दरम्यान नीतू सिंगने भरून काढली.
या सिनेमातील अकबरची भूमिका ही अकबर बादशाहची असेल, असे समजत ऋषींनी ती नाकारली होती, पण मनमोहन देसाईंनी गैरसमज दूर केल्यावर ऋषी कपूरनी सिनेमा स्वीकारला.
सत्यं शिवं सुंदरममध्येही राज कपूर राजेश खन्ना यांना घेऊ इच्छित होते, पण ऋषींनी आग्रह करत त्यांना शशी कपूर यांना घेण्यास भाग पाडले. डिंपलमुळे राजेश खन्नाबरोबर निर्माण झालेल्या वितुष्टाचे ऋषी यांनी असे उट्टे काढले, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. याच दरम्यान त्यांच्या “हम किसी से कम नही’, “सरगम’ आदी सिनेमांनी दणदणीत यश मिळविले. नीतू सिंगबरोबरच्या प्रेमाची परिणीतीही लग्नात झाली, पण दुर्दैवाने लग्नानंतर आलेल्या त्यांच्या सिनेमांनी सपाटून मार खाल्ला. या साऱ्याचे खापर त्यांनी नीतू सिंगवर फोडले. त्यांच्या या काहीशा तऱ्हेवाईक वागण्यामुळे त्यांच्यात आणि नीतू सिंगमध्ये तणावच राहात असे. कर्ज सिनेमाही अपेक्षित यश न देऊ शकल्याने ऋषी यांना नैराश्याने गाठले. मानसोपचार तज्ज्ञाला बोलावण्याइतपत स्थिती बिकट झाली, पण ‘नसीब’ ‘प्रेमरोग’ हिट ठरले. पुढे ‘सागर’, ‘नगीना’, ‘चांदनी’ इत्यादींच्या घवघवीत यशाने सारी काजळी पुसून काढली.
“प्यार झुकता नही’, “डर’ असे काही सिनेमे त्यांनी गैरसमजामुळे नाकारले, जे पुढे सुपरहिट ठरले, ते न केल्याची त्यांना खंत होती. हृषिदा, बासुदा, गुलजार यांच्याबरोबर काम न करू शकल्याची सलही होती. ‘आ अब लौट चले’, आर के च्या या सिनेमाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. वयाच्या पंचेचाळिशीपर्यंत आणि तीस नायिकांबरोबर नायक म्हणून काम करण्याचे भाग्य लाभलेल्या ऋषी यांचे नाव, अनेक अभिनेत्रींबरोबर, प्रामुख्याने टीना मुनीम व जुही चावलाबरोबर जोडले गेले होते.
‘तवायफ’ या सिनेमानंतर दुबई येथे त्यांची आणि दाऊदच्या झालेल्या भेटीमुळे त्यांच्यावर संशयाचे झाकोळ आले, पण ते पेल्यातील वादळ ठरले. राकेश रोशन, जितेंद्र या जीवश्च मित्रांबरोबरचे बेबनावही चर्चेचे विषय ठरले. संजय खान बरोबरची त्यांची मारामारी तर पोलिसांपर्यंत जाता जाता राहिली. अमिताभ आपल्या सहकलाकारांना कधीच श्रेय देत नाही, असा थेट आरोपही त्यांनी केला होता. आपल्या परखड स्वभावाने कायमच टीकेचे धनी होणाऱ्या ऋषी कपूर यांनी भारतातील सार्वजनिक मालमत्तांना गांधी कुटुंबीयांचीच नावे का? असा सवाल करीत धुरळा उडवून दिला होता.
असे असताना न्यूयॉर्क येथील एका मंदिराच्या उभारणीसाठी सुनील गावसकरबरोबर ऋषी यांनी मोलाची आर्थिक मदत केली असल्याचे अनेकांना माहीतही नसेल. ‘गाल पे गाल चढ़ा हुआ, गोल मटोल छोरा’, असलेल्या ऋषी यांनी सेकंड इनिंगही तळपत ठेवली. ‘अग्निपथ’, ‘औरंगजेब’, ‘डी डे’, ‘मुल्क’ आदी सिनेमांतील त्यांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या. आपली कन्या रिधिमाचे लग्न लावून देत त्यांनी रणवीरच्या करिअरवर लक्ष देणे सुरू केले.
काही वर्षांआधी त्यांना कर्करोगाने गाठले. परदेशी उपचारही केले. शेवटी या विकाराशी दीर्घ झुंज देत 30 एप्रिल 2020 मध्ये त्यांचे निधन झाले आणि रजतपटावरील एक मनमोहक चेहरा लोप पावला.
सत्येंद्र राठी