जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनात प्रवेश करण्याचा प्रसंग स्वातंत्र्योत्तर भारताच्या लोकशाहीतील आणि राजकीय प्रवासातील एक ऐतिहासिक क्षण आहे. संसद भवन ही केवळ वीट आणि वाळूंनी उभारलेली इमारत नाही तर देशाची समृद्ध संसदीय परंपरा पुढे नेणारी आणि तिचे आधार बळकट करणारी वास्तू आहे, हे विसरता येणार नाही. नव्या वास्तूत प्रवेश करताना जुन्या आठवणींचे तरंग मनात उमटले.
प्रतिष्ठित, ऐतिहासिक आणि अनेक घडामोडींचे साक्षीदार असलेल्या संसद भवनातील कामकाज नव्या भवनात स्थानांतरित करताना माझ्या मनात भावनांची गर्दी झाली आहे. सुमारे तीन दशकं या संसदेची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले आणि या भवनातील चढउतार अगदी जवळून पाहिल्याने आठवणी जाग्या झाल्या आहेत. या ठिकाणी मी ठरवून आलो नाही तर योगायोगाने संसद भवनात सेवा करण्याची संधी मिळाली अन्यथा त्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. 1985 मध्ये दिल्ली विद्यापीठात राज्यशास्त्रात एम.ए. केल्यानंतर एम.फील आणि पी.एचडीसाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्रवेश घेतला.
अशाच योगायोगाने उदरनिर्वाहासाठी लोकसभा सचिवालयात दाखल झालो. घडले असे, की एकेदिवशी दुपारच्या जेवणाच्या वेळी संसद भवनासमोरून जात होतो. मला भूक लागली होती. संसद भवनात कमी दरात भोजन मिळते, हे मला ठाऊक होते. त्यामुळे माझ्या मनात विचार आला की, या ठिकाणच्या स्वागतकक्षात कमी पैशात चांगले जेवण घ्यायचे का? मी इमारतीच्या परिसरात जाण्याचा प्रयत्न केला असता तेथील बंदोबस्ताला असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याने हटकले आणि इमारतीत येण्याचे कारण विचारले. तेव्हा मी म्हणाले, की मला लोकसभा सचिवालयातील संशोधक सहायकाच्या पदासाठी अर्ज हवा आहे आणि त्यास मी पात्र आहे.
अशा रितीने मी सप्टेंबर 1985 मध्ये सचिवालयात रूजू झालो आणि त्यावेळी मला रूजू होण्यासाठी तत्कालीन लोकसभेचे मुख्य सचिव डॉ. सुभाष कश्यप यांना भेटण्यास सांगितले. अर्थात, माझ्या कामाने ते प्रभावित झाले होते, असे मला वाटते. कारण, भविष्यात माझ्याकडून सचिवालयात भरीव काम होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. यासंदर्भात ते एका अधिकाऱ्याशी बोललेदेखील होते. माझी नियुक्ती सचिवालयाच्या संशोधन आणि माहिती विभागात करण्यात आली. माझ्यावर लोकसभेच्या अध्यक्षांसह अन्य मान्यवरांना प्रासंगिक कार्यक्रमासाठी भाषणाचा मसुदा लिहून देण्याची जबाबदारी सोपविली. जसे संसदेंतर्गत असणारा संघ, राष्ट्रकुल संसदीय संघटना यांचे कार्यक्रम आणि संसदेला सदिच्छा भेट देणाऱ्या शिष्टमंडळासमोर बोलणे.
नव्या वास्तूत प्रवेश करताना एक गोष्ट मनात येते आणि ती म्हणजे 1980 च्या दशकाच्या मध्यान्ही संसद भवन परिसरात असणारा मोकळेपणा, मुक्त प्रवेश हे आजच्या मजबूत आणि विस्तारित संसद भवनाच्या संकुलात दिसेल का? 1960 च्या दशकात संसद भवन परिसरात एखादा सार्वजनिक रस्ता असेल असा कोणी विचारही करू शकणार नाही. अर्थात, दिल्लीच्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ खूपच कमी होती. मारुती मोटार आलेली नव्हती.
राजधानीच्या रस्त्यावर एकमेव धावणारी मोटार म्हणजे ऍम्बेसिडर आणि फियाट. संसद भवनात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कोणतीही सुरक्षा तपासणी केली जात नव्हती. खासदार हे साऊथ एव्हेन्यू अणि नॉर्थ एव्हेन्यू तसेच मीना भाग येथील निवासस्थानांतून दिल्ली ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशनच्या बसच्या माध्यमातून संसद भवनात पोहोचत असत. डीटीसीने संसद भवनात आताच्या जुन्या स्वागत कक्षाच्या कार्यालयजवळ काउंटर सुरू केले होते.
हा केवळ संसद भवनापर्यंत जाण्याचा योग्य मार्ग नव्हता तर खासदारांना देखील सोयीचा मार्ग होता. म्हणजे संसद भवनात सहजपणे प्रवेश करता येत असे, त्याचबरोबर खासदारही भेटत असत. मला आठवते, की एकदा प्राध्यापक मधु दंडवते यांच्याशी मी एका कामानिमित्त संपर्क साधला.
अर्थात, त्यांनी नुकतेच रेल्वेचे मंत्रिपद सोडले होते, पण संसद भवनाच्या संकुलात असलेल्या रेल्वे बुकिंग काउंटरवर तिकीट आरक्षित करण्यासाठीच्या मागणीपत्रावर त्यांची सही हवी होती. प्राध्यापक दंडवते यांनी लगेच स्वाक्षरी केली. दंडवते यांच्यासारख्या लोकप्रिय आणि नामांकित व्यक्तींमध्ये असलेली नम्रता आजघडीला पाहावयास मिळणे दुर्मीळ आहे. संसद भवनातील आणखी एक ऐतिहासिक संस्था म्हणजे ग्रंथालय. पार्लमेंटरी लायब्ररी बिल्डिंगमध्ये स्थानांतरित होण्याअगोदर हे ग्रंथालय संसद भवनाच्या परिसरातच होते..
नव्या संसद भवनात एक गोष्ट दिसणार नाही, म्हणजे सेंट्रल हॉलची भव्यदिव्यता. सेंट्रल हॉल हे भारतीय लोकशाहीचे जिवंत उदाहरण आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 14/15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री देश स्वतंत्र होत असताना ऐतिहासिक भाषण केले होते. अशा घटनाचे साक्षीदार असलेला सेंट्रल हॉल हा देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर लोकसभा अस्तित्वात येताना राष्ट्रपतींच्या अभिभाषणासाठी प्रसिद्ध आहे. यानुसार पहिल्या अधिवेशनाच्या संयुक्त सत्रात खासदारांना राष्ट्रपती संबोधित करतात. गरज भासल्यास दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठकही या ठिकाणी भरविण्यात येते.
अर्थात, नवीन संसद भवन हे राज्यसभा आणि लोकसभेच्या अशा दोन्ही सभागृहातील सदस्यांना सामावून घेण्यास सक्षम आहे. मात्र, देश-विदेशातील अध्यक्ष, राष्ट्रप्रमुख यांच्या संसदेला संबोधन करण्याच्या परंपरेचे काय होणार? अशा ऐतिहासिक क्षणी आपण केवळ एकच इच्छा बाळगू शकतो की ज्या संस्था केवळ विटा, मातींनी उभारलेल्या नाहीत पण समृद्ध संसदीय परंपरांनी साकारलेल्या आहेत आणि काळानुरूप त्या टिकून राहिल्या आहेत, अशा संस्था आणखी मजबूत व्हायला हव्यात.
– रुप नारायण दास