दक्षिण भारतात प्रामुख्याने कर्नाटकात विधानसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. आयाराम गयारामची वर्दळ वाढली आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपला रामराम ठोकला. त्यांना आपल्या गळाला लावण्यासाठी कॉंग्रेसने फिल्डिंग लावली आहे. पक्ष सोडल्याचा फटका नक्कीच भाजपला बसेल आणि त्याचा परिणाम वीस ते पंचवीस जागांवर दिसून येईल, असा ठाम विश्वास शेट्टर यांनी व्यक्त केला. यावरून शेट्टर यांचे कर्नाटकातील राजकीय वलय नाकारता येत नाही.
शेट्टर हे 2012 ते 2013 या काळात मुख्यमंत्री राहिलेले आहेत. 68 वर्षीय शेट्टर हे 2008 ते 2009 मध्ये कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष होते. आता ते हुबळी-धारवाड मतदारसंघाचे आमदार आहेत. 20 ऑगस्ट 2019 रोजी ते भाजप नेतृत्वाखालील सरकारमध्ये मध्यम उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले.
बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर कॅबिनेट विसर्जित झाली तेव्हा त्यांनी भविष्यात आपण कोणत्याही मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असे जाहीर केले. यावरून ते नाराज झाल्याचे संकेत मिळत होते. संघाचे ते जुने कार्यकर्ते आहेत. उत्तर कर्नाटकातील भागात त्यांची राजकीय पकड मजबूत आहे. शेट्टर हे राज्यातील येडियुरप्पानंतरचे भाजपचे सर्वात मोठे लिंगायत नेते म्हणून ओळखले जातात. राज्यात सत्तेची किल्ली लिंगायत समाजाच्या हाती असल्याचे मानले जाते. हुबळी-धारवाड (मध्य) मतदारसंघ हा त्यांचा पारंपरिक गड मानला जातो. डिसेंबर 1955 मध्ये जन्मलेले शेट्टर हे 1994 रोजी पहिल्यांदा विधानसभेत पोचले आणि त्यानंतर 1996 मध्ये भाजपचे सचिव झाले.
2005 मध्ये त्यांना कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष केले. शेट्टर यांनी सहा वेळेस निवडणुका जिंकल्या आणि प्रत्येक वेळी त्यांनी 25 हजारांपेक्षा अधिक मते मिळवली आहेत. भाजपप्रणित सरकारच्या काळात त्यांनी वेगवेगळे मंत्रालय देखील सांभाळले आहेत. त्यांची गणना कर्नाटकातील मातब्बर नेत्यांत होते आणि कर्नाटकात भाजपची पाळेमुळे सर्वत्र नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते येडियुरप्पाचे निकटवर्तीय मानले जातात. शेट्टर यांनी वीस वर्षे वकिली व्यवसाय केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत 224 पैकी 212 उमेदवारांची घोषणा केली आहे आणि तरी त्यांचे नाव यादीत आलेले नाही. त्यावरून ते भाजपवर नाराज झाले. त्यांना भाजपच्या तिकिटावर हुबळी धारवाडमधून निवडणूक लढण्याची इच्छा होती. परंतु ही इच्छा पूर्ण होईल, असे वाटत नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी भाजपचे श्रेष्ठी कितपत साभांळतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
गेल्या काही वर्षांपासून नाराज असलेले सी. आर. केशवन यांनी अखेर कॉंग्रेसचे सदस्यत्व सोडले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेले केशवन हे देशाचे पहिले गव्हर्नर सी. राजगोपालचारी यांचे पणतू होत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले आणि म्हणून ते भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळू लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तमिळनाडूच्या दौऱ्यावर असताना केशवन यांचा भाजप प्रवेश झाला. त्यांच्या प्रवेशाने भाजपला हुरूप आला आहे.
भाजपने म्हटले की, केशवन यांनी प्रवेश केल्याने तमिळनाडूच्या राजकारणात पक्षाचा सक्षम आवाज म्हणून समोर येतील. भाजप गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण भारतात आपले बस्तान बसविण्यासाठी खूप कष्ट घेत आहे. परंतु कर्नाटक वगळता अन्य ठिकाणी भाजपला यश आलेले नाही. तमिळनाडूत सहकारी पक्ष अण्णाद्रमुकमध्येच पक्षातर्गंत वादावादी सुरू असल्याने भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. केशवन यांच्या माध्यमातून राजाजी यांचा वारसा सोबत येईल आणि तमिळनाडूतील सवर्ण गटाला खेचण्यासाठी संदेश देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे बोलले जात आहे. केशवन यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील “भारत जोडो’ यात्रेपासून चार हात लांब राहणेच पसंत केले. त्यांनी 2000 मध्ये कॉंग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला.
केशवन याचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठीशी असणारे थेट संबंध आणि दिल्लीतील संपर्क यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात त्यांचा प्रवेश सुलभ झाला. कालांतराने केशवन यांना श्रीपेरंम्बदूर येथील राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ यूथ प्रोग्रेसचे उपाध्यक्ष केले. तसेच त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला. यूपीए काळात त्यांनी आणि संस्थेने देशातील तरुणांशी निगडित नव्या धोरणाला नवीन दिशा देण्यात सक्रिय भूमिका बजावली आणि ते प्रसारभारतीशी संबंधितही होते. एवढेच नाही तर कॉंग्रेस श्रेष्ठींनी त्यांना चिदंबरम, इलागोव्हनसारख्या सिनियर नेत्यांप्रमाणे प्राधान्य देत तमिळनाडू कॉंग्रेस समितीच्या समाजसेवी ट्रस्टमध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपविली, पण त्यांना स्थानिक पातळीवर बराच विरोध झाला. ट्रस्टचे काम योग्य रितीने करत नसल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.
2014 मध्ये केशवन यांनी पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढण्याचा प्रस्ताव मांडला; परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. यानंतरही त्यांनी तमिळनाडू राज्यसभेसाठी प्रयत्नही केले, परंतु तेथेही निराशाच पदरी पडली. शेवटी त्यांचा कॉंग्रेसमधील रस कमी झाला. आता त्यांनी भाजपला साथ देण्याचे ठरविले आहे. यूनिव्हर्सिटी ऑफ मद्रास येथील इंजिनिअरिंगची पदवी घेणारे केशवन यांना एकवेळ कॉंग्रेस पक्षाचा तरुण चेहरा म्हणून मानले जात होते.
– विशाल बेळगावकर