खेळांमध्ये खेळाडू हा मध्यवर्ती असला पाहिजे. इतर माध्यमांचे भांडणं, कलह यामुळे खेळ आणि खेळाडू दोन्हीचे नुकसान होते. परिणामी देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर डागाळते.
केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्यात ऑनलाइन बैठकीदरम्यान चांगलाच वाद घडला. त्यावरून संतापलेल्या रिजीजू यांनी बैठक अर्धवटच सोडल्याचे वृत्त आपण सर्वांनीच वाचले आहे. अर्थात क्रीडा संघटना, केंद्रीय क्रीडा मंत्रालय तसेच एकूणच क्रीडा क्षेत्रातील वाद आपल्याला नवीन नाहीत. मात्र, आता खेळाडूंच्याच मुळावर उठणारे हे वाद कधी संपणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
क्रीडा मंत्रालय असो किंवा विविध खेळांच्या संघटना यांच्यात उत्तम समन्वय राखला गेला पाहिजे तरच खेळाडूंचे भले होते, अन्यथा त्या खेळासह खेळाडूंचेही प्रचंड नुकसान ठरलेले असते.
टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंच्या तयारीचा तसेच सराव व प्रशिक्षणाची माहिती घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून जगात करोनाचा धोका सातत्याने वाढल्यामुळे अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे खेळाडूंचे नुकसान तर झालेच पण टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीलाही मोठा फटका बसला.
आता जगभरात अनेक देशांमधून हा धोका कमी होत असला तरीही जपानमध्ये तीच परिस्थिती आहे किंबहुना वाढतानाच दिसत आहे. अशा स्थितीत तिथे ऑलिम्पिक स्पर्धा होणार का, हाच मोठा प्रश्न सध्या उभा ठाकलेला आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी यंदा भारताच्या अनेक खेळाडूंनी पात्रताही मिळवलेली आहे. त्यामुळे यंदाच्या या स्पर्धेत भारताला जास्त पदकांची अपेक्षाही आहे.
या स्पर्धेसाठी जगभरात पात्रता स्पर्धा होत आहेत. मात्र, ज्या स्पर्धांमध्ये सरस कामगिरी करत ऑलिम्पिकची पात्रता मिळवण्याची भारताच्या अनेक खेळाडूंना मिळालेली संधी या स्पर्धाच रद्द झाल्यामुळे हिरावली गेली आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंना अद्याप या स्पर्धेमधील स्थानही निश्चित करता आलेले नाही. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा संघटनांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत अन्य पर्यायाचा विचार करावा तसेच अन्य पर्याय निवडण्यासाठी आयओएवर दडपण टाकावे, असे रिजीजू यांनी व्यक्त केले होते.
मात्र, या विधानाचा वेगळाच अर्थ बात्रा यांनी काढला व या दोघांमध्ये शाब्दिक देवाणघेवाण झाली व त्यामुळे संतापलेल्या रिजीजू यांनी बैठक सोडून निघून जात आपला निषेध नोंदवला. खरेतर क्रीडा मंत्रालय, विविध खेळांच्या संघटना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) यांच्यात सुसंवाद असणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासूनचे चित्र भारतीय क्रीडा क्षेत्राला धक्का देणारे दिसत आहे.
हे वाद नवे नाहीत पण ते संपुष्टात आणण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांत मनापासून प्रयत्नच झालेले नाहीत हेच अशा प्रसंगातून सिद्ध होत आहे. यातून कोणी बोध घ्यायचा त्यावरूनही मानापमान नाट्य घडेल त्यामुळे सुज्ञास जास्त सांगणे न लागे म्हणतात हे पटते. ऑलिम्पिक खेळ, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, कुस्ती यांच्यासह अन्य काही खेळांच्या संघटनांमध्येही वाद रंगलेले आपण पाहिले आहे. मात्र, किमान ऑलिम्पिक स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना आपला इगो सांभाळणे महत्त्वाचे आहे का खेळाडूंचे हित पाहणे महत्त्वाचे, याचा कुठेतरी सगळ्यात स्तरावर विचार व्हावा हीच काय ती अपेक्षा आहे.
अमित डोंगरे