बदल हा सध्याच्या युगाचा स्थायी भाव होऊन बसला आहे. अशा बदलांना सामोरे जाताना आपल्यातही काही बदल घडवून आणले पाहिजेत नेमके याचविषयी थोडेसे…
आपल्या सभोवती रोज नित्य नवे काही तरी घडत असते. काही बदल होत असतात, पण आपल्या रोजच्या कामाच्या व्यापात अशा घडणाऱ्या बदलांची दखल आपण घेऊ शकतोच, असे नाही, पण असे झालेले अथवा घडणारे बदल आपल्यावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या परिणाम करणारे असतात.
जसे की 90 च्या दशकात एसटीडी केंद्र हे संपर्काचे अतिशय प्रभावी साधन होते. बाहेरगावी संपर्क साधण्यासाठी त्याकाळी रांगा लागत असत. एवढेच काय त्याकाळी दूरध्वनी घरी घेण्यासाठी प्रतीक्षा सूची होती. दोन-दोन वर्षे थांबावे लागत असे. पण काळ बदलला आणि एसटीडी केंद्रांचे महत्त्वच संपले. एसटीडी केंद्र कालबाह्य झाले. एकेकाळी ध्वनी फित खूप मोठ्या प्रमाणावर ऐकल्या जात, त्यानंतर तबकड्या आल्या, त्यानंतर पेन ड्राइव्ह आले, आता हे सर्वच गेले. फक्त ऍपवर गाणी ऐका. एवढेच काय एकेकाळी दूध फक्त सकाळीच उपलब्ध होत असे आता तसे राहिले नाही. दूध हे केव्हाही उपलब्ध आहे. असे बदल झाले आहेत आणि भविष्यात होणार आहेत.
आपल्यापैकी बरेच जण आपण भले आणि आपले काम भले असे समजून खाली मान घालून गपगुमान काम करीत असतात. काहीजण असे असतात की त्यांचा ज्या मंत्रालयाशी संबंध येत असतो, त्या खात्याचा मंत्रीसुद्धा माहीत नसतो. अशा माणसांजवळ काही चालू घडामोडींबाबत बोलायला लागलो तर “जाऊ द्या हो, आपल्याला काय करायचे?’ असे आपल्याला सुनावतात. याशिवाय आपण त्यांच्याकडे जर काही जिज्ञासेपोटी त्यांच्या क्षेत्रासंबंधात काही माहिती विचारली तर त्यांना त्याबाबत माहिती नसते. मग सोडवणूक करून घेण्यासाठी “ज्या गावाला जायचे नाही त्या गावचा रस्ता आपण नाही विचारीत.’ असे मोठ्या अभिमानाने सांगतात.
अशा माणसांचे असे वागणे हे त्यांनाच घातक ठरत असते, याची त्यांना जाणीवही नसते. ते फक्त त्यांच्या विश्वात रममाण असतात. त्यांना वाटत असते की, आपल्यावर कशाचा काहीही परिणाम होणार नाही. पण वास्तविक पाहता परिणाम हा होतच असतो. जसे एसटीडी केंद्र कालबाह्य झाले तशी ही माणसेसुद्धा कालबाह्य होतात. जर ती माणसे नोकरीत असतील तर त्यांना नारळ दिला जातो. जर व्यवसाय करीत असतील तर ते त्या व्यवसायातून बाहेर फेकले जातात. ही अशी माणसे नंतर त्यांचे नाकर्तेपण लपविण्यासाठी नशिबाला दोष देत बसतात किंवा “अहो करायचे तेव्हा पुष्कळ काम केले आता नाही जमत, म्हणून सगळे बंद केले.’ असे सांगायला मोकळे.
जे काही नवीन येत असते ते आधीपेक्षा खूपच सोपे आणि सुटसुटीत असते. आधी जर काही किचकटपणा असेल, तर तो काढून अधिक सोपे केले जाते. तीस वर्षांपूर्वी भारतातील बॅंका या संगणकीकृत नव्हत्या. त्यावेळी असलेले खातेदार आणि होणारे व्यवहार हेही मर्यादितच होते. त्याकाळी परगावचा धनादेश वटायलासुद्धा वेळ व पैसा दोन्ही खर्च होत असे. सर्व काही हातानेच व्यवहार होत असत. आजच्या तारखेला बॅंकांचे सर्व व्यवहार जर संगणकाशिवाय करावयाचे म्हटले तर शक्यच नाही. कारण आज खातेदारही कितीतरी पटीने वाढले आणि व्यवहरांची गतीही फारच वाढली. हे सगळे संगणकाच्याच सहाय्याने शक्य झाले. म्हणजेच काळ व तंत्रज्ञान यांचा रेटा एवढा तीव्र असतो की ते बदल आपल्याला स्वीकारावेच लागतात.
जे नवीन तंत्र येते ते बरेच बदल करते. जेव्हा एखादे तंत्र बदलते तर नवीन तंत्रानुसार बनविलेले यंत्र हे कमी सुटे भाग असणारे असते. कमी काळजी घ्यावे लागणारे असते. अधिक गतिमान असते. यामुळे आधीच्या यंत्राला जेवढ्या दुरुस्त्या लागत होत्या तेवढ्या आता नवीन यंत्राला लागत नाहीत. त्यामुळे ते यंत्र दुरुस्त करणारे तंत्रज्ञ यांना मिळणारे काम कमी होते. तसेच आधी एखादे काम पूर्ण करण्यासाठी समजा एक आठवडा लागणार असेल तर नवीन यंत्राने तेच काम अर्ध्या दिवसात पूर्ण होते, या नवीन यंत्राबरोबर ग्राहकाच्याही अपेक्षापण वाढतात. ग्राहक लगेच त्याच्या नियोजनात त्या कामासाठी एखादा दिवस राखून ठेवतो. आपण चौकसपणे होणाऱ्या बदलांनुसार नवीन तंत्र आत्मसात करायला हवे.
कात्रीला मधूनमधून धार लावावी लागते, तसेच आपणही आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपले ज्ञान, कौशल्य हे अद्ययावत करायला हवे. सध्या काळ एवढा झपाट्याने बदलत चालला आहे की, आपल्याला काळाच्या गतीबरोबर जुळवून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. सुरुवातीला संगणक आले, त्यानंतर लॅपटॉप आले, नंतर टॅब आले, आता भ्रमणध्वनी संचच बहुतेक सर्व गरजा पूर्ण करू लागला. हे बदल फार झपाट्याने होत गेले. म्हणून “मला काय करायचे’ अशा विचाराचा माणूस कितपत तग धरेल हा प्रश्नच आहे.
आपण सभोवताली घडणाऱ्या घटनांचे, बदालांचे जर आकलन करून घेतले, तर आपण आपल्या नोकरी-व्यवसायात आवश्यक ते बदल करू शकतो. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या कामात करू शकतो. पण यासाठी आपले डोळे, कान उघडे ठेवावे लागतात. तसेच नवीन बदल स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागते. असे बदल स्वीकारण्यासाठी आपली मानसिक तयारीही आवश्यक आहे.
आपण आपल्यात योग्य तो बदल घडवून आणला पाहिजे. जर आपण मानसिकदृष्ट्या तयार नसू तर पुढची आपली सगळीच प्रगती खुंटते. नवीन काही आत्मसात करण्यासाठी “वय’ हे कधीच आडवे येऊ द्यायचे नाही. बरीच माणसे “आता या वयात काय शिकणार?’ असा सवाल करून पळ काढतात. पण ही माणसे स्वतःला मुख्य प्रवाहाबाहेर लोटत असतात.
सध्या तरी माणसाला मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी कोणतेही कृत्रिम तंत्रज्ञान आलेले नाही. त्यासाठी आपले आपणच तयार व्हायला हवे. म्हणूनच आपण आपल्या मन मंदिराच्या गाभाऱ्यात बसून “स्वतःला मानसिकदृष्ट्या नवीन बदल स्वीकारण्यास सदैव तयार आहे…’ अशा विचारांचे जर पुष्प वाहून स्वतःला जर मानसिकदृष्ट्या सशक्त बनविले तर भविष्यात होणाऱ्या कोणत्याही बदलाला आपण नक्कीच समर्थपणे सामोरे जाऊ यात शंका नाही.
– अनिकेत भालेराव