“किल्लेदार’ची संकल्पना पवार मोडीत काढणार का?; राष्ट्रवादीला मिळाले तरुण चेहरे
नगर (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. माजीमंत्री मधुकर पिचडांसह अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी सोडली. विधानसभा निवडणुकीत पक्ष किती तग धरणार यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असतांना निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीला नवसंजीवनीच मिळाली. तब्बल सहा जागांवर बाजी मारून जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयाला आला. या निवडणुकीत राष्ट्रवादीला
आमदारांच्या रुपाने तरूण चेहरे मिळाले त्याबरोबर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी नवे नेतृत्व मिळाले आहे. आता फक्त पवारांनी केवळ तालुका न पाहता संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी घेवून पक्ष संघटना बळकट करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आजवरचा किल्लेदारची संकल्पना त्यांनी मोडीत काढावी अशी कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा झालेल्या पराभवानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीला गळतीच लागली होती.पक्षाचे विद्यमान तीनही आमदार पक्षाचे तिकिट नाकारण्याच्या मनस्थिती होते. त्यापैकी माजीमंत्री मधुकर पिचड व त्यांचे सुपुत्र माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये प्रवेश केला. उर्वरित दोन्ही आमदारांचा तो प्रयत्न होता. पण त्यात त्यांना यश आले नाही.अखेर दोघांनी राष्ट्रवादीत थांबण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी आमदार संग्राम जगताप पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरले. पण माजी आमदार राहुल जगताप यांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी विधानसभेत किती यश मिळविणार याबाबत शंका व्यक्त होत होती. पक्षाच्या अस्तित्व टिकणार का असा प्रश्न निर्माण झाला होतो.
अकोले, पारनेर, नगर शहर, या मतदारसंघातील पक्षाने नेते व कार्यकर्त्यांनी पक्षांतर केले. श्रीगोंदा, शेवगावमधील नेत्यांनी तलवारी म्यान केल्या होत्या. अशा स्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस विधानसभेच्या रिंगणात उतरली. काही मतदारसंघात तर युतीसाठी एकतर्फीच निवडणूक होईल अशी स्थिती निर्माण झाली होती. युतीचे उमेदवार त्याच हवेत होते. परंतु प्रत्यक्ष निवडणूक प्रचाराला सुरवात झाल्यानंतर हळूहळू स्थितीमध्ये बदल होत गेला. त्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्येक मतदारसंघात प्रचार सभा घेवून तेथे पक्षाची डागडुजी केली. अडचणी असल्या तरी मार्ग काढण्याची दिशा दिली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी प्रत्येक मतदारसंघाचा आढावा नित्याने शरद पवारांना दिला. त्यातून आवश्यक त्या सुधारणा त्यांच्या सुचना मिळाल्या की त्या उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहविण्याचे काम फाळके यांनी केले.
सोपी व सरळ वाटणारी निवडणुकीत त्यामुळे सात ते आठ मतदारसंघात अटीतटीची झाली. युतीच्या उमेदवारांना वाटल नव्हते, पण स्थिती बदलली. राष्ट्रवादीसाठी अनकूल झाली. शेवटच्या टप्प्यात युतीच्या उमेदवारांनी चंगचंग निवडणुकीत हातात आणण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यात अपयशी ठरले. राष्ट्रवादीने या निवडणूकीत जिल्ह्यातील बारापैकी आठ जागा लढविल्या. तर एक जागा पुरस्कृत केली. नेवाश्यात शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे नेते आमदार शंकरराव गडाख यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. ज्यांनी तलवारी मान्य केल्या होत्या. त्या नेत्यांनी या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली. ते पक्षासाठी झटले. त्यामुळे नेवाश्यात आ. गडाखांचा विजय सुखर झाला.
श्रीगोंद्यात देखील घनश्याम शेलार यांनी राहुल जगताप यांच्या बळावर चांगलीच लढत दिल्याने शेवटच्या दोन फेऱ्यात माजीमंत्री बबनराव पाचपुते यांचा विजय झाला. तोपर्यंत पाचपुतेंचे देव पाण्यात होते. या निवडणुकीच्या निमित्त्याने राष्ट्रवादीने आहे ते मवाळे एकसंघ झाल्याने उमेदवारांचा विजय होण्यास मोठी मदत झाली. या निवडणुकीत पक्षाला मिळालेले घवघवीत यशामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीला नवसंजीवनी मिळाली असून पुन्हा एकदा पक्ष जोमाने उभा राहिला असल्याचे चित्र दिसत आहे.
या निवडणुकीच्या निमित्याने पक्षाला आता आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून नवे नेतृत्व मिळाले आहे. पक्ष वाढीबरोबरच तो बळकट करण्यासाठी पवारांनी पुढाकार द्यावा अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. या निवडणुकीत जे आमदार निवडून आले. त्यातून पक्षाला तरूण चेहरा मिळाला आहे. ही पक्षाच्या दृष्टीने जमेचे बाजू आहे. आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार रोहित पवार हे तरूण चेहरे आता पक्षाला मिळाले आहे.