पळसदेव, (वार्ताहर)- पळसदेव गावातील मुख्य कमान ते शेलारपट्टा येथील हवालदार चौकापर्यंतच्या रस्त्यासाठी माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी निधी दिला; मात्र रस्त्याचे अतिशय संथ गतीने सुरु असलेल्या कामामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. गावातील एक किमीपर्यंत सिमेंटच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे; मात्र साइडपट्ट्या भरल्या नसल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरच गाडी उभा करावी लागत आहे. नागरिक रस्त्यावर दोन्ही बाजूला गाडी पार्क करत असल्यामुळे मुख्य रस्त्यावर सतत ट्रवाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे.
रस्ता सिमेंटचा झाला; मात्र रस्त्याची उंची अधिक असल्याने साइडपट्ट्याला अर्धा ते एक फुटापर्यंत उंची वाढल्याने गाडी रस्त्यावरून उतरवता येत नाही. परिणामी नागरिक आपली चारचाकी व दुचाकी गाडी रस्त्यावरच पार्क करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराचा साइड पट्ट्या भरण्याचं काम करण्यामध्ये चाललेला चालढकलपणा नागरिकांच्या जीवावर उठला आहे.
रस्त्यावरून उतरताना अनेकांना पडून दुखापत झाली आहे. तर दुचाकी व चारचाकी गाड्यांचेदेखील नुकसान झाले आहे. तरी देखील गावातील रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग गांभीर्याने दाखल घेत नाही शिवाय लोकप्रतिनिधी याबाबत मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे हा त्रास आणखी किती दिवस सहन करायचा, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्यापासून ग्रामपंचायतीने दुटप्पी भूमिका घेतली. अतिक्रमण हटवताना भेदभाव केला. त्यामुळे व्यापारी व पदाधिकारी यांच्यामध्ये दुरावा वाढला. त्यात गावातील व्यापार्यांमध्ये देखील संघटन नाही. यामुळे ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला आवश्यक विरोध होताना दिसत नाही. ठेकेदार मनमानी पद्धतीने कारभार करत आहे.
गेल्या अनेक दिवसापासून येथील नागरिक व व्यापार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठेत रुग्णालय, कापड दुकान, खत औषधे दुकान, सराफ, जनरल स्टोअर्स, हॉटेल यामुळे दिवसभर वर्दळ असते. खरेदीसाठी आलेले नागरिक जागेअभावी आपल्या गाड्या रस्त्यावरच पार्क करून निघून जातात. त्यामुळे गावात सातत्याने कोंडीची समस्या भेडसावत आहे.
रस्ता नसता झाला तरी चालले असते
आता गावची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मागील वर्षी देखील नागरिकांना यात्रा काळात मोठा त्रास सहन करावा लागला होता. या वर्षी तरी किमान दिलासा असेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती; मात्र सध्या देखील रस्त्याच्या साइडपट्ट्या न भरल्याने नागरिक व व्यापार्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
अनके नागरिकांनी व व्यापार्यांनी स्वखर्चाने या रस्त्याच्या साइडपट्ट्यांना मुरूम टाकून घेतला आहे. याचा नाहक आर्थिक भुर्दंड नागरिकांना व व्यापार्यांना सहन करावा लागला आहे. रस्त्याच्या रेंगाळलेल्या कामामुळे होत असलेल्या त्रासामुळे हा रस्ता नसता झाला तरी चालला, आता अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.