Supiya Sule: संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील खासदारांच्या निलंबनाचं सत्र सुरूच आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे आज आणखी 49 खासदारांना निलंबित करण्यात आले. अशा प्रकारे संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहे. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. या लोकसभेतील खासदारांच्या निलंबनाच्या या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे निलंबित करण्यात आलं आहे. तर, लोकसभा) आणि राज्यसभाअशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. सुप्रिया सुळे यांनी निलंबनानंतर प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीसाठी आजचा काळा दिवस असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आतापर्यंत 100 पेक्षा जास्त खासदार निलंबित करण्यात आले आहे., संसदेत हल्ला झाला, त्यासंदर्भात आम्ही चर्चेची मागणी केली. पण प्रश्न विचारणारे बाहेर आहेत. लोकशाहीच्या मार्गानं आम्ही निवडून आलो, पण सध्या दडपशाही सुरु झाली. सत्ताधाऱ्यांना विरोधक नको आहेत, त्यामुळे निलबंनाची कारवाई करण्यात आली. आमचं सरकार होतं, त्यावेळी आम्ही कधीचं असं केले नाही.”
पुढे त्या म्हणाल्या, “देशाच्या गृहमंत्र्यांनी येऊन संसदेत झालेल्या हल्ल्यासंदर्भात निवेदन द्यावे, त्यावर चर्चा व्हायला हवी आहे. पण सरकारला चर्चा करायची नाही, दडपशाही सुरू आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच, लोकशाहीसाठी आजचा काळा दिवस आहे. लोकशाहीचा आवाज दाबण्याचं पाप आज दिल्लीमध्ये होत आहे. विरोधी पक्षाला हद्दपार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
दरम्यान, संसदेचे हिवाळी अधिवेशनात आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन घेरले आहे. संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ सुरू केला. लोकसभेत अध्यक्षांचा अपमान करणाऱ्या अनेक खासदारांना आज पुन्हा निलंबित करण्यात आले आहे.
निलंबित खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होण्यापासून रोखण्यात आले आहे. या खासदारांमध्ये सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह लोकसभेतील अनेक विरोधी खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले.