आपटीच्या ग्रामस्थांनी दहा दिवसांत श्रमदानातून राबवला उपक्रम
डिंभे – आपटी (ता. आंबेगाव) येथे ग्रामस्थांनी रस्त्यासह येथील मोऱ्यांचे काम दहा दिवस श्रमदानातून केले असून, ग्रामस्थांचा हा उपक्रम सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात कौतुकास्पद ठरला आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला 72 वर्षे उलटून गेली तरी आपटी (ता. आंबेगाव) हे गाव रस्त्यापासून वंचित राहिलं होत. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी दोन वेळा केलेली आंदोलने व सततच्या पाठपुराव्यामुळे गावात मागील वर्षी आपटी ते ठाकरवाडी, गंगापूर खुर्द या रस्त्याचं मातीकाम झालं होतं. मात्र, पहिल्या पावसातच या रस्त्याचा काही भाग तुटला आणि रस्त्याच्या मोऱ्या तुंबून मातीने गाडल्या गेल्या होत्या. सरकारने या वर्षी रस्त्याच्या पुढील कामासाठी निधी टाकला नव्हता आणि त्यात भर म्हणून करोनाच्या संसर्गात सरकारचा घसरता आर्थिक आलेख पाहता पुढील काही वर्षे रस्त्यासाठी निधी मिळेल, अशी सुरताम शक्यता नव्हती. मात्र, रस्त्याची डागडुजी करणे अत्यंत गरजेचे होते. अन्यथा कधी नव्हे तो झालेला रस्ता पावसाळ्यात जास्त धुवून जाऊन नंतर रस्ता रस्त्याने पायीसुद्धा येणे अश्यक्य झाले असते.
हा धोका ओळखून आणि सरकारच्या आर्थिक परिस्थितीची अडचण समजून घेऊन गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन करोनामुळे बंद झालेल्या यात्रेची वर्गणी दरवर्षीप्रमाणे गोळा केली. पुणेकर, मुंबईकर नोकरदार मंडळाच्या सदस्यांनी सध्याच्या कठीण काळातही आपल्या खिशाला बसणारी जास्तीची झळ सोसली आणि त्यांना जमेल तेवढी आर्थिक मदत जमा करून गावाला पाठवून दिली.
यानंतर करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राम स्वच्छता करून आपल्या कामाला सुरुवात केलेल्या यावर्षी नव्याने स्थापन झालेल्या युवकांच्या ग्राम विकास समितीने गावातील जुन्या जाणत्या कारभारी मंडळींच्या मार्गदर्शनाने रस्त्याच्या कामासाठी नियोजन करून कामाला सुरुवात केली आणि हे काम पूर्ण केले आहे. आदिवासी भागातील आपटी गावच्या शाश्वत विकासासाठी कंबर कसलेल्या युवकांच्या समितीने काही दिवसांतच गावात लोकसहभागातून ग्रंथालयाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा समितीचे अध्यक्ष अविनाश गवारी व सचिव दत्ता गवारी यांनी ग्रामस्थांच्या वतीने बैठकीत केली…
- ग्रामस्थांचे नियोजनपूर्ण काम
महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण दहा दिवसांच्या कामात गावातील साऱ्या नागरिकांनी श्रमदान केलं आणि पुढच्या काळात येणाऱ्या संकटाला सामोरे जात रस्त्याच्या कडेने गटार खोदणे, गाडलेल्या मोऱ्या खुल्या करणे आणि तुटलेल्या रस्त्यावर बांध घालून रस्त्याच्या डागडुजीचं अत्यंत महत्त्वाचं काम पूर्ण केले आहे.