सातारा -कोयना धरणग्रस्तांच्या वर्षानुवर्षे रखडलेल्या पुनर्वसनाला गती मिळणार असून दि. 16 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि डॉ. भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत जमीन वाटपाची सुरुवात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दि. 1 मेपासून जमीन मागणीचे अर्ज स्वीकारण्याचा निर्णयही या बैठकीत झाला.
मुंबई येथे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, डॉ. भारत पाटणकर यांच्यासह महसूलचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव डॉ. असीम गुप्ता, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी व इतर विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन महत्वपूर्ण निर्णय झाले.
कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तीन हजार हेक्टर इतकी जमीन आवश्यक असून सातारा, सांगली, सोलापूर, रायगड जिल्ह्यात वाटपासाठी साधारण दीड हजार हेक्टर जमीन उपलब्ध असल्याचे सांगून संकलनप्रमाणे 1 मे पासून पसंती फॉर्म भरून घेऊन 16 मेपासून त्यातील काही लोकांना प्रातिनिधिक स्वरूपात जमीन वाटप करून सुरवात करण्याचा निर्णय यावेळी झाला. कोयना जलाशयाच्या हद्दी निश्चित करून मासेमारी व पर्यटनाचा प्रस्ताव आठ दिवसांत गृह मंत्रालयाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. त्याचबरोबर नौकाविहार सात किलोमीटरच्या पुढे करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा. वन विभागाच्यावतीने आलमट्टीच्या धर्तीवर जल, जंगल, जमीन केंद्रस्थानी ठेवून स्थानिक लोकांचा विकास प्रकल्प राबविताना प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून योजना राबवली जाईल. महानिर्मिती, महावितरण व महापारेषाणमध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचा विशेष प्रस्ताव सादर होताच त्याला तात्काळ मंजुरी देण्याचा निर्णयही यावेळी करण्यात आला.
नवीन ग्रामपंचायतीच्या प्रस्तावाबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश देऊन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. कोयना अभयारण्याग्रस्तांना जमीन वाटप करताना केवळ 80 गुंठे जमीन दिली आहे. शासन निर्णयानुसार त्यांना एक हेक्टर जमीन वाटपाचाही निर्णय करण्यात आला. बैठकीला श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, चैतन्य दळवी, संतोष गोटल, महेश शेलार, सचिन कदम, सीताराम पवार, प्रवीण साळुंखे, तानाजी बेबले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व श्रमुदचे कार्यकर्ते उपस्थित होते.