लखनौ, दि. 7 – विकासासाठी सुधारणांची गरज आहे. देशातील गेल्या एक शतकांपासून अस्तित्वात आलेले कायदे हे देशावर मोठा भार ठरले असून ते बदलण्याचीही आज नितांत गरज आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आग्रा येथील मेट्रो प्रकल्पाचे आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. कृषी क्षेत्रातील सुधारणांच्या कायद्यांना देशभरातून विरोध होत आहे व त्याच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर मोदींनी केलेल्या या विधानांना महत्व आहे.
मोदी म्हणाले की देशाच्या विकासासाठी अनेक व्यापक सुधारणा सरकारने हाती घेतल्या आहेत.या सुधारणा वेगाने करण्याचा आमचा प्रयत्न आहेत. देशातील विविध कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न आधीच्या सरकारांमध्येही झाला पण त्यांचा वेग अत्यंत संथ होता. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील असतानाच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक गुंतवणूक देशात आणण्यासाठी प्रयत्न जारी आहेत असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी आज व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे ज्या आग्रा मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले तो प्रकल्प 8 हजार 379 कोटी रूपयांचा आहे. 29.4 किमी लांबीच्या या प्रकल्पांद्वारे आग्रा शहरातील ताजमहाल सारखी अन्यही ऐतिहासिक ठिकाणे जोडली जाणार आहेत. येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पुर्ण केला जाणार आहे.