पारनेर – तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा, सोयाबीन, ज्वारी, मका, हरभरा, कलिंगड, टरबुज , द्राक्ष बागा व इतर फळबागा भाजीपाला व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. आदेशातील संदिग्धते मुळे काही ठिकाणी ज्वारी, मका, हरभरा पिकांचे पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे सर्व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्याची भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य कॉ. आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मा. तहसीलदार सौ. ज्योती देवरे यांना देण्यात आले.
निवेदन स्विकारल्या नंतर शिष्टमंडळाने उपस्थित केलेले प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मा. तहसीलदार सौ. ज्योती देवरे यांनी संबंधित तलाठी, मंडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून वंचित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नावे यादीत समाविष्ट करण्याचे आदेश दिले.या प्रसंगी भाकपचे तालुका सचिव कॉ. संतोष खोडदे, गणेश कावरे दादाभाऊ गायकवाड उपस्थित होते