मुंबई – भाजपाचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी काल मंगळवारी अचानकपणे राजकाराणातून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यांच्या या निर्णयाची कोणालाच कल्पना नव्हती. निलेश राणे यांनी राजकारणातुन बाहेर पडत असल्याचा घोषणा केल्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी निलेश राणेंची भेट घेतली आहे.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि राणे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वादंग सुरु आहेत. त्यात निलेश राणेंच्या या निर्णयानं हा वाद चव्हाट्यावर आला. कुडाळ-मालवण मतदारसंघातून निलेश राणे तयारी करत होते अशावेळी त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले. यातच रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यात ३ तास चर्चा झाल्याचे म्हंटले जात आहे. निलेश राणेंची मनधरणी रवींद्र चव्हाणांकडून केली जात आहे.
यानंतर आता निलेश राणे आणि रविंद्र चव्हाण दोघे सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यातून आता काय माहिती समोर येणार हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, निलेश राणे यांनी ट्वीटवर (एक्स) लिहिले की, “नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९-२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.”
पुढे त्यांनी लिहीले की, “मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र”, असे निलेश राणे यांनी म्हंटले आहे.