रावणगाव -करोना व्हायरस संसर्गजन्य आजाराच्या वाढत असलेल्या प्रभावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रावणगाव (ता. दौंड) परिसरात रविवारी (दि. 22) एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात आला आहे.
रावणगाव, खडकी, मळद, स्वामी चिंचोली येथे ग्रामपंचायत, आरोग्य प्रशासन, पोलीस प्रशासन, शासकीय अधिकारी यांनी कर्फ्यू संदर्भात जनजागृती करून सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत घराबाहेर न पडता बंदला उत्तम प्रतिसाद दिला. सकाळ पासूनच सर्व दुकाने, हॉटेल्स, कार्यालये बंद ठेवून सर्व लोकांनी घरात बसणे पसंत केले. गावोगावचे सरपंच, शासकीय अधिकारी-कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस प्रशासन हे सर्व या परिस्थीतीवर लक्ष ठेवून आढावा घेत आहे. शेतात काम करणाऱ्या शेतमजूर महिला व पुरुषांनी देखील कामावर न जाता घरीच थांबून या कर्फ्यूला प्रतिसाद दिला.