मुंबई – शिवसेनेचा 16 आमदार अपात्रतेचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांवर ही जबाबदारी सोपवली आहे. मात्र अद्याप यावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. आमदार अपात्रतेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश असल्याने त्यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. यावरून एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित आमदार अपात्र ठरतील आणि मुख्यमंत्री पदावर इतर नेत्याची निवड केली जाईल, असा दावा विरोधी पक्षांकडून केला जात आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकणाथ शिंदेच राहतील असे सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे अपात्र झाले तरीही तेच मुख्यमंत्री राहतील. शिंदे अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेवर निवडून आणले जाईल आणि तेच पुढे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, “फडणवीसांना माहिती आहे की शिंदे हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना खात्री आहे की शिंदे आता अपात्र ठरणार आहेत. तरी अपात्र ठरल्यावर आम्ही त्यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचं पद टिकवू असं फडणवीस म्हणत आहेत.
पुढे ते म्हणाले, “म्हणजेच, तुमच्याकडे एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद टिकवायला तोडगा आहे. परंतु, मराठा आरक्षणावर तोडगा नाही. मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. त्यांचं आंदोलन सुरू आहे. तुमच्याकडे त्यांच्यासाठी तोडगा नाही. शिंदे आणि त्यांच्या टोळीला वाचवायला तोडगा आहे. मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मात्र तुम्हाला सोडवता येत नाही.”
संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यानंतरही विधान परिषदेवर आमदार होतील. परंतु, त्या ४० आमदारांचं काय? त्या प्रत्येकाला तुम्ही विधान परिषदेवर घेऊन घटनाबाह्य पद्धतीने राज्य करणार आहात का? देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य धिक्कार करण्यासारखं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांची टोळी अपात्र ठरल्यानंतही तुम्ही त्यांना विधान परिषदेवर घेणार आणि मंत्रीपद टिकवणार, याचा अर्थ तुम्ही कायदा, संविधान आणि नितीमत्ता मानायला तयार नाही. भाजपावाले सर्वोच्च न्यायालयाचंही ऐकायला तयार नाहीत. ही कसली मस्ती आहे? याला माज म्हणतात. देशातली जनता तुमचा हा माज २०२४ साली उतरवे,” असा इशाराही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.