पुणे- उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या कमकुवत व गरजू विद्यार्थ्यांना रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाउंडेशनद्वारा दरवर्षी शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. मागील 17 वर्षांपासून आजपर्यंत 11,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला आहे.
करोना काळात शाळा-महाविद्यालये बंद असली, तरीही विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरल्याशिवाय ऑनलाइन शिक्षणही पूर्ण करता येत नाही. म्हणूनच वैद्यकीय शिक्षण अथवा नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी करोना काळात केलेल्या वैद्यकिय सेवेच्या कामाची दखल घेऊन सोलापूर, अहमदनगर, पुणे, अमरावती, धुळे, सोलापूर, नांदेड, वाशिम, नाशिक, बुलढाणा,
इत्यादी जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्तीचे वितरण रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर. धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोपटलाल ओस्तवाल उपस्थित होते.
फाउंडेशनद्वारा दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती प्रदान सोहळा आयोजित केला जातो. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यास ठराविक वेळ देऊन शिष्यवृत्तीचा धनादेश देण्यात आला.
दरम्यान, “यापुढेही शिक्षण पूर्ण करण्याकरिता विद्यार्थ्यांच्या पाठीशी आरएमडी फाउंडेशन सदैव उभे आहे,’ अशी माहिती शोभाताई आर. धारिवाल यांनी दिली.