जळगाव – दानवे हे फक्त स्वप्न पाहतात, मनोरंजनाच्या गप्पा मारतात, असा चिमटा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी काढला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.आघाडीचे काही लोक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काल केला होता. त्या पार्श्वभूमीवर खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
खडसे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवित असतात. चंद्रकांत पाटील यांनी तर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या अनेक तारखा दिल्या. मात्र, त्या तारखा मागे गेल्या आहेत. आता दानवे हेही फक्त स्वप्न पहात आहेत. दानवे यांच्या फक्त मनोरंजनाच्या गप्पा सुरू आहेत. खरे तर आता कोणत्याही आमदाराची पक्ष बदलण्याची मनस्थिती नाही.
त्यामुळे दानवे यांनी नुसते हवेत तीर सोडू नये. आतापर्यंत राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना अशी आरोप-प्रत्यारोपाची राळ सुरू होती. शिवसेनेच्या नेत्यांना भ्रष्टाचाराचे आरोप करून जेरीस आणणाऱ्या किरिट सोमय्या यांच्या विरोधात संजय राऊत मैदानात उतरले होते. ते प्रकरण अगदी गंभीर वळण घेत असतानाच आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा ठिणग्याही आता पडल्या आहेत.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपली जबाबदारी पार पाडावी. आता त्यांनी बाहेर पडावे आणि काम करावे. मुख्यमंत्र्यांच्या पायाला भोवरा असावा, तोंडात साखर असावी, पण जे दाऊदला मदत करतात त्यांना हे सध्या मदत करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
शरद पवार यांनी कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कान धरले पाहिजेत, पण शरद पवारांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झाली आहे, असा उल्लेख दानवेंनी केला होता. त्याला खडसेंनी उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे खडसे भाजपमध्ये असताना त्यांचे आणि दानवेंचे असलेले सख्य जगजाहीर होते. त्यामुळे आता खडसेंच्या टिप्पणीला दानवे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कसा प्रतिसाद देतात याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.