कोलकाता – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपउपांत्यपूर्व फेरीतील झारखंड व नागालॅंड लढत अखेर अनिर्णित अवस्थेत संपली. या सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून तब्बल 1586 धावा झाल्या. या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या महत्त्वपूर्ण गुणांच्या जोरावर झारखंडने स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
नागालॅंडने नाणेफेक जिंकत झारखंडला पहिल्या डावात प्रथम फलंदाजी दिली होती. कुमार कुशाग्राने दमदार द्विशतक (266) तर शाहबाज नदीम (177) व विराट सिंग (107) यांनी शतके फटकावताना संघाला तब्बल 880 धावांचा डोंगर उभारून दिला. त्यानंतर नागालॅंडचा पहिला डाव 289 धावांत रोखत झारखंडने मोठी आघाडी घेतली होती. नागालॅंडच्या चेतन बिस्तने (126) शतकी खेळी केली.
मात्र, तरीही त्यांनी नागालॅंडला फॉलोऑन न देता फलंदाजीचा सराव करत दुसरा डाव 4 बाद 417 धावा केल्या. अखेर हा सामना अनिर्णित राहिला व झारखंडने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. झारखंडचा द्विशतकवीर कुमार कुशाग्रा सामन्याचा मानकरी ठरला आहे. आता या प्राथमिक फेरीचे सामने पार पडले असून आयपीएल स्पर्धा संपल्यावर उपांत्यपूर्व, उपांत्य व अंतिम सामना खेळवला जाणार आहे.