मुंबई : पाकिस्तानचे पंतप्रधान व्यंगचित्रामध्ये शोभेल त्याप्रमाणे दारोदारी हिंडत आहेत, अशी जळजळीत टीका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीरच राग आळवल्याच्या मुद्दयावरून त्यांनी ही टीका केली. अशा काही शक्ती आहेत ज्यांना भारताच्या किनाऱ्यावर मुंबईसारखा हल्ला करायचा आहे, पण त्यांच्या या योजना यशस्वी होणार नाहीत, असेही सिंह यांनी म्हटले आहे. मुंबईतील मॅजॅगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे भारताची दुसरी स्कॉर्पिन-क्लास पाणबुडी “आयएनएस’-खंदेरी आणि आयएनएस “नीलगिरी’ या युद्धनौकेच्या जलावतरण प्रसंगी ते बोलत होते.
राजनाथ सिंह यांचे निम्मे भाषण संयुक्त राष्ट्राच्या आमसभेतील इम्रान खान यांचे भाषण, भारत आणि काश्मीर आणि कलम 370 च्या तरतुदी रद्द करणे ही पुरोगामीपणा असल्याचे प्रतिपादन करणारे होते.
एकीकडे जम्मू-काश्मीरमधील आमची पुरोगामी पावले जगभरात स्वीकारली जात आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान घरोघरी जाऊन व्यंगचित्रकारांसाठी सामग्री तयार करीत आहेत. पाकिस्तानला आता हे समजले पाहिजे की “आयएनएस’- खंदेरी सुरू झाल्याने गरज भासल्यास मोठ्या ताकदीने प्रहार करण्याची भारताची क्षमता वाढली आहे. सैन्यदल मजबूत आणि आधुनिक करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे सांगितले.
“हाऊडी मोदी’ कार्यक्रमाच्यावेळी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारताच्या सामर्थ्याची कबुली दिली आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरूद्ध लढायला भारत सक्षम आहे, असेही ट्रम्प यांनी असेही म्हटले होते याची आठवण सिंह यांनी यावेळी करून दिली. 1971 मध्ये झालेल्या युद्धात ऑपरेशन ट्रायडंट आणि ऑपरेशन पायथनने पाकिस्तानच्या नौदलाचा कणा मोडला होता. भारतीय नौदलाच्या या कामगिरीचा देशाला अभिमान आहे, असे ते म्हणाले.
तंत्रज्ञानाची प्रगती आणि नवीन यंत्रसामग्री खरेदी करण्याच्या दृष्टीने आम्ही सशस्त्र दलाच्या गरजा पूर्ण करण्यास वचनबद्ध आहोत. अलिकडच्या काळात आम्ही भारतीय नौदलाच्या आधारे अरबी समुद्रात चाचेगिरीच्या घटना रोखण्यात यश आले आहे. अरबी समुद्र आणि हिंद महासागरात शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही राज्याविरूद्ध नौदल कडक कारवाई करेल, असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.