नवी दिल्ली: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी इस्त्रायलचे संरक्षणमंत्री बेंजामिन गेंट्झ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावेळी चीनी कुरापतींमुळे सीमेवर निर्माण झालेल्या तणावाचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित झाला.
भारत आणि इस्त्रायलमध्ये संरक्षण सामग्री खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. तिला गती देण्यावर चर्चेचा भर राहिला. मागील काही वर्षांपासूून इस्त्रायली संरक्षण सामग्रीचा भारत मोठा खरेदीदार देश बनला आहे.
त्या देशाकडून भारत विविध शस्त्रास्त्र प्रणाली, क्षेपणास्त्रे आणि मानवरहित हवाई यानांची खरेदी करतो. राजनाथ आणि गेंट्झ यांनी दोन्ही देशांमधील संरक्षण आणि सुरक्षाविषयक संबंध वाढवण्याची गरज अधोरेखित केली.
करोना संकटावर मात करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याची ग्वाही दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली. चीनी कुरापतींमुळे सीमेवर तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि इस्त्रायलमधील मैत्रीला विशेष महत्व आहे.
तणावानंतर अनेक देश भारताच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे भारतानेही इतर देशांबरोबरचे संबंध आणखी दृढ करण्यावर भर दिला आहे.