माधव विद्वांस
आपल्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत गाजलेल्या 25 चित्रपटांचे दिग्दर्शक राजा ठाकूर यांची आज जयंती. त्यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1923 रोजी कोल्हापूर जवळील फोंडा येथे झाला. 1935 ते 1955 दरम्यान चित्रपटक्षेत्रात काम करणारे अनेक कलाकार, दिग्दर्शक, संगीत-दिग्दर्शक, गीत-रचनाकार इ. प्रकाशझोतात आले.त्यापैकी मराठीमध्ये आपला ठसा उमटविणारे राजा ठाकूर हे दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आले. त्यांचे वडील पोलीस खात्यात होते वरचेवर त्यांची बदली होत असे. ते रसिक नाट्यप्रेमी होते.
गावात नाटक आले की संयोजक व कलाकारांना आपल्या घरी जेवणाची व्यवस्था करीत असत. अर्थात, त्यामुळे मुलालाही नाटकाची गोडी लागली. वर्ष 1940 मध्ये त्यांची आवड लक्षात घेऊन रत्नागिरी येथे आलेल्या देशबंधू नाटक कंपनीत त्यांना पोचविले. तेथे त्यांना सुरुवातीला प्रॉमटिंगचे काम मिळाले व नाट्यक्षेत्रातील अगदी छोट्या कामापासून सुरुवात झाली; परंतु येथे काही प्रगती होणार नाही हे लक्षात येताच त्यांनी संकलक म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ते कोल्हापूरच्या नवयुग चित्र कंपनीत आले. तेथे असलेले संकलक जुन्नरकर यांच्याकडे ते संकलन शिकू लागले.जुन्नरकर हे स्वत: उत्तम संकलक होते व सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही ते काम पाहात. त्यांनी ठाकूर यांना संकलक वसंत कुलकर्णी यांचे सहाय्यक म्हणून नेमले. त्यानंतर ते जुन्नरकरांना संकलनात सहाय्यक म्हणून काम करू लागले. वर्ष 1947 मध्ये संगीतकार शंकरराव पवार यांनी राजा परांजपे यांचे नाव निर्मात्याला “बलिदान’ या चित्रपटासाठी सुचविले.
राजाभाऊंनी राजा ठाकूरचं संकलनाचं काम पाहिलं होते 1947 ते 1953 पर्यंत 6 वर्षांत सुमारे 15 चित्रपटांचं संकलन ठाकुरांनी केलं आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम संकलक म्हणून लौकिक मिळविला. संकलक म्हणून काम करीत असतानाच राजा ठाकूर व त्यांचे मित्र बाळ बापट हे वेळ मिळेल तेव्हा पुण्यातील कॅम्प भागातील चित्रपटगृहांमध्ये जाऊन इंग्रजी चित्रपट पाहात व त्यातील नावीन्य व तंत्र यांचा अभ्यास करीत असत. तसेच या बाबतीत राजाभाऊ परांजप्यांशी चर्चा करीत असत.
“लाखाची गोष्ट’ हा चित्रपट पूर्ण झाला. “पेडगावचे शहाणे’ चित्रपटातील ऑपरेशन थिएटरमधील चित्रीकरणाच्या वेळी त्यांच्या कल्पकतेने त्यांच्या कात्रीच्या करामतीने प्रेक्षकांना श्वास रोखण्यास भाग पडले. वर्ष 1953 मध्ये “बोलविता धनी’ हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. 1953 ते 1975 या 23 वर्षांच्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीत 20 मराठी, 2 हिंदी व “बिरबल ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. मुंबईचा जावई हा चित्रपट सर्वांना भावला. “रईसजादा’ हा दुसरा हिंदी चित्रपट राजा ठाकुरांनी करायला घेतला. पण तो चित्रपट पूर्ण व्हायच्या आतच त्यांचे 28 जुलै 1975 रोजी निधन झाले.